नवी दिल्ली - अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातील परराष्ट्र मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ लावताच कामा नये, असा रोखठोक सल्ला सरकारला दिला आहे. "सरकार मुंबईवरील दहशतवादी हल्ला विसरून गेले; तसेच पठाणकोटबाबतही होईल,‘ असे भाकीत करून सिन्हा यांनी स्वपक्षीय भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. मात्र पाकिस्तानच्या कुरापती, त्यामागे तेथील लष्कराची फूस व त्याच्याही मागील सुप्त जागतिक दबाव या तीन पायांच्या शर्यतीबाबत सिन्हा यांनी मौन बाळगले.
आपल्या काळात पाकिस्तानशी चर्चेची वकिली करणारे सिन्हा यांनी आता मात्र पाकशी कदापी चर्चा नको, असा सल्ला स्वपक्षीय सरकारला दिला आहे. त्यांनी सांगितले, की वाजपेयी सरकारमध्ये मी केवळ परराष्ट्र मंत्रीच नव्हतो, तर परराष्ट्र व्यवहारांबाबत भाजपचा प्रवक्ताही होतो. दहशतवाद व चर्चा हे एकाच वेळी होऊ शकत नाहीत, असे आम्ही पाकिस्तानमधील मुशर्रफ सरकारला स्पष्टपणे बजावले होते. भारताची तयारी असली तरी चर्चा हवी असेल तर आधी हे दहशतवादी हल्ले थांबवा असे सांगितले होते. पाकिस्तानकडून केवळ माना डोलावल्या जातात; पण अशा प्रस्तावांवर लेखी सहमती कधीही दिली जात नाही याचे "कारण‘ उघड आहे. असे हल्ले करणारे "नॉन स्टेट ऍक्टर्स‘ आहेत, आम्ही तरी काय करणार, हा पाकचा शुद्ध ढोंगीपणा आहे. भारताविरुद्ध आग ओकणारा हाफीज सईद पाकच्याच भूमीवरून कारवाया करतो तर त्याला पाकिस्तानच संपूर्ण जबाबदार आहे. 2014 मध्ये नवे सरकार आल्यावर सुषमा स्वराज यांनीही "गोळीबार सुरू असेल तर चर्चा ऐकू येणार नाही,‘ असे सांगून सर्वप्रथम थेट वाजपेयी सरकारचीच भूमिका घेतली होती. पण सरकारने दहशतवादावर आता अचानक भूमिका का बदलली हे गूढ आहे. असे व्हायला नको आहे. कारण पाकसारखा शेजारी असताना भूमिकेतील असे बदल घातक ठरू शकतात, असे सिन्हा यांनी नमूद केले.
सुषमा स्वराज नामधारी?
सिन्हा यांनी स्वराज या परराष्ट्र मंत्री असण्यापेक्षा सागरपार भारतीयांच्या (ओव्हरसीज इंडियन्स) मंत्रीच जास्त असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, की सुषमा स्वराज अतिशय कार्यक्षम आहेत. मात्र निखळ परराष्ट्र व्यवहारांवर त्यांची किती वक्तव्ये आली? परदेशात संकटात अडकलेल्या भारतीयांची सोडवणूक करण्याचा मुद्दा असेल तेथे त्यांना भूमिका व तीही मर्यादितच दिली जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा