देशभरात
15 हजार; तर महाराष्ट्रात साडेसातशे जागा
औरंगाबाद
- मेगाभरती करण्याची परंपरा भारतीय स्टेट बॅंकेने यंदाही कायम राखली आहे. देशभरात बॅंकेतर्फे
लिपिक संवर्गातील 15 हजारांच्या वर जागा भरल्या जाणार असून, यात महाराष्ट्रासाठीच्या
साधारणतः साडेसातशे जागांचा समावेश आहे. कनिष्ठ सहायक आणि कनिष्ठ कृषिसहायक या दोन
पदांची ही भरती होईल.
नियमित आणि विशेष भरती मोहिमेअंतर्गत एसबीआयने या जागा भरण्याची प्रक्रिया सुरू
केली आहे. 25 एप्रिलपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून, त्यासाठी स्वतःचा
ई-मेल आयडी असणे अत्यावश्यक आहे. कनिष्ठ सहायकासाठी (ज्युनियर असोसिएट्स - कस्टमर
सपोर्ट अँड सेल्स) कोणत्याही शाखेतील पदवी तर कनिष्ठ कृषिसहायकासाठी कृषीतील पदवी आवश्यक
आहे. पदवीच्या अंतिम सेमिस्टरला अथवा वर्षाला असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र
आहेत. तथापि, अंतिम निवडीच्या वेळी पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.