For Advertise in this Section please connect 9422264829 or mail at sainik.darpan@gmail.com
शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७
सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७
आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार १५ टक्के कापला जाणार
मुलाविरोधात वृद्ध आई वडिलांना तक्रार करण्याचाही अधिकार
सरकारी कर्मचारी असूनही तुम्ही जर घरात असलेल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारलीत तर तुमचा पगार १५ टक्के कापला जाणार आहे. आसाम विधानसभेने या संदर्भातले विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. मुलाच्या खात्यातून कापलेला पगार हा आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे. ‘प्रणाम’ (पॅरेन्ट रिस्पॉन्सबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटबिलिटी अँड मॉनिटरींग) असे या विधेयकाचे नाव आहे.
शुक्रवारीच हे विधेयक आसाम विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारून त्यांना वृद्धाश्रमात धाडले आहे असे आई-वडील हे लेखी तक्रार करु शकतात. सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे ही तक्रार पीडित आई-वडिलांनी करायची आहे. त्यानंतर ९० दिवसात आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन आसाम सरकारतर्फे देण्यात आले आहे.
वृद्ध आई-वडिलांवर त्यांच्या निवृत्तीच्या काळात एकाकी आयुष्य व्यतीत करण्याची वेळ येऊ नये. तसेच त्यांची रवानगी कोणत्याही वृद्धाश्रमात केली जाऊ नये म्हणून आम्ही हा कायदा आणला असल्याचे स्पष्टीकरण हेमंत बिस्वा शर्मा यांनी ‘द टेलिग्राफ’ सोबत बोलताना दिले आहे. आपल्या देशातील एकाही राज्यात असा कायदा आत्तापर्यंत झालेला नाही. आसामने या प्रकारच्या कायद्याची सुरुवात केली आहे. हा कायदा सुरूवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असला तरी तो लवकरच सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्रातही लागू होणार आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.
गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७
धुळ्याच्या जवान शास्त्रज्ञाला सैन्यदलाचा पुरस्कार
एल. बी. चौधरी : 06.18 PM
सोनगीर (जिल्हा धुळे): देशाच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून दररोज मृत्यूशी संघर्ष करीत हिमालयाच्या निर्मनुष्य व ऑक्सिजनची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांचे बर्फ कोसळण्याच्या घटनेत प्राण जावू नये म्हणून आधीच सुचना देण्याचे कार्य 'रक्षा अनुसंधान तथा विकास संघटन रक्षा मंत्रालय न्यू दिल्ली' अंतर्गत 'हीम तथा अवधाव संस्थान' करते. या संस्थानात प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या धुळ्यातील अमोल युवराज महाले (वय 24) या शास्त्रज्ञाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला बर्फ व हिमस्खलन अध्ययन प्रतिष्ठानकडून (मनाली, हिमाचल प्रदेश) स्वातंत्र्यदिनी सेना प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अमोलचे वडील युवराज उखा महाले सेनादलात हवालदार होते. सध्या जिल्हा सैनिक कार्यालयात कार्यरत असून, सैनिक भुवन (धुळे) येथे राहतात. अमोल ने आठवी पर्यंत राजे संभाजी सैनिक शाळा, दहावीपर्यंत जे. आर. सिटी व बीएस्सी जयहिंद महाविद्यालयात तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमएस्सी (भुगर्भशास्त्र) केले. त्यानंतर दिल्लीला स्पर्धा परीक्षा (saptem) दिली. मनालीला मुलाखत झाली. आणि त्याची निवड सैन्यदलातील हीम तथा अवधाव संस्थान मध्ये प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून अवघ्या दहा महिन्यापूर्वी झाली. त्याच्या सोबत मुंबई व दिल्ली आयआयटीमधील 20 जण प्रकल्प शास्त्रज्ञ म्हणून काम करीत असून तो एकटाच महाराष्ट्राचा असून आयआयटी विद्यार्थी नाही. तरीही त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला एकट्याला सेना प्रशस्ती पत्रक मिळाले आहे. यासंदर्भात अमोलने त्यांच्या भयावह व अत्यंत कठीण कामाबद्दल माहिती दिली. ते नुसते ऐकूनही माणूस सुन्न होतो.
हिमालयाची उंची वाढण्याच्या कारणांचा शोध घेणे व हिमस्खलन प्रक्रियेचा अभ्यास हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. मनाली पासून शेकडो किलोमीटर हिमालयाच्या 22 हजार फूट उंचीवर प्राणवायूची कमतरता असलेल्या हिमाच्छादित भागात हिमस्खलनाचा अभ्यास केला जातो. विद्यूत चुंबकीय लहरी सोडून बर्फाचा थर तपासून कोणता थर कच्चा आहे याची माहिती जाते. रॅमसंग रॉडने तसेच स्कीइंग करून बर्फ कच्चा आहे की काय तसेच हवामानशास्त्रानुसार हवेची दिशा, आर्द्रता, तापमान, ढगाचा प्रकार याचा अभ्यास केला जातो. बर्फावरील दाब, ताण व विकनेसचा अभ्यास स्नो लेअर स्टॅटीग्राफीने केला जातो. अमोल स्नो फिजिक्समध्ये तरबेज झाले आहेत. या सर्व अभ्यासावरून लेह, लद्दाख व सियाचिन भागात बर्फात राहतांना सुरक्षित मार्गाची (सेफ झोन मार्क) आखणी केली जाते. त्याच मार्गाने सैनिकांना ये जा करण्यास सांगितले जाते.
मनाली ते लेह दरम्यान हिमस्खलनाचा अभ्यास करुन त्यांनी अनेक नवीन बाबी उघडकीस आणल्या. व अधिक सुरक्षितता मिळेल असे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आर्मी कमांडेशन पुरस्कार मिळाला. त्यांचा सत्कार करण्यात आला. व त्यांची भारतीय भुविज्ञान सर्वेक्षण मध्ये प्रशिक्षणार्थी भुवैज्ञानिक म्हणून निवड होऊन त्यांचा हिमनदी प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला. या प्रशिक्षणात देशातील केवळ 20 जणांची निवड झाली असून अमोल महाले महाराष्ट्रातील एकमेव आहेत. हिमनदीचा उगम, पाण्याचा घर्षणामुळे पात्र मागे सरकणे, पाण्याचा वेग तसेच बर्फात चालणे व जीव कसा वाचवावा याचे मार्गदर्शन प्रशिक्षणात मिळणार आहे. अमोलला हिम तथा अवधाव संस्थानचे डायरेक्टर डॉ. आशुतोष गांजू, भुवैज्ञानिक डॉ. सत्यप्रकाश शुक्ल, कर्नल एस. एच. मान. कर्नल दिनेश दिक्षीत यांचे मार्गदर्शन लाभले.
जग वाचवणारा माणूस नकळत जग सोडून गेला...
स्टॅनिस्लाव्ह पेट्रोव या नावाचा आणि आपला थेट काही संबंध नाही. पण, कदाचित या पृथ्वीवर आपण अस्तित्वात आहोत, यामागे स्टॅनिस्लाव्ह कारणीभूत आहेत. 'जगाला वाचविणारा माणूस' म्हणून गेली 34 वर्षे लष्करी जगतात प्रसिद्ध असणाऱया स्टॅलिस्लाव्ह यांनी आज, 19 मे रोजी जगाचा अखेरचा निरोप घेतल्याचे गेल्या 24 तासांत जगाला समजले.
स्टॅनिस्लाव्ह तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या लष्करातील लेफ्टनंट कर्नल दर्जाचे अधिकारी. 26 सप्टेंबर 1983 ची ती रात्र न जाणो पृथ्वीवरच्या मानवजातीवरचे संकट होते. अमेरिका आणि सोव्हिएत रशियातील शीत युद्ध शीगेला पोहोचण्याचा तो काळ होता. क्षेपणास्त्र हल्ल्याची सूचना देणाऱया दक्षिण मॉस्कोमधील आपल्या कार्यालयात स्टॅनिस्लाव्ह ड्युटीवर होते. अमेरिकेने आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागले, तर त्याची सूचना या कार्यालयाला पहिल्यांदा मिळेल, अशी सोव्हिएत महासंघाची लष्करी व्युहरचना होती. अचानक स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयातील संगणक धडाधड संदेश देऊ लागला.
असे संदेश येणे याचा दुसरा अऱ्थ सोव्हिएत साम्राज्याच्या उपग्रहांनी अमेरिकेने डागलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र मॉस्कोच्या दिशेने येत असल्याची सूचना दिल्यासारखे होते. क्षेपणास्त्राच्या रॉकेट इंजिनमधून बाहेर पडणाऱया उष्णतेचे मोजमाप करून त्यानुसार रशियन सैन्याला अॅलर्ट करण्याची व्यवस्था उपग्रहांमध्ये बसवली होती. ओको क्रमांक 5 हा उपग्रह रशियाने लष्करी टेहळणीसाठी सोडलेल्या उपग्रहांच्या मालिकेतील सर्वात नवा गडी. स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयातील सर्पुकोव्ह-15 या कॉम्प्युटवर याच उपग्रहाने आंतरखंडीय हल्ल्याची सूचना देणारा संदेश धाडला होता.
कुठलाही संदेश पुन्हा पुन्हा पडताळून पाहण्याची आवश्यकता स्टॅनिस्लाव्ह यांना माहिती होती. मात्र, त्या रात्री ओको क्रमांक 5 ने 'तीव्र विश्वासार्ह' स्वरुपाचा संदेश दिल्यामुळे स्टॅनिस्लाव्ह यांच्या पायाखालची जमीन सरकली. या लेफ्टनंट कर्नलने सारासार विवेकबुद्धी वापरली. एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र रशियावर डागून आण्विक युद्ध सुरू करण्याएवढी अमेरिका मुर्ख नाही, असा स्वतःशीच निर्णय घेतला. स्टॅनिस्लाव्ह आपल्या वरीष्ठांकडे गेले आणि तत्काळ आपल्याकडे असलेली माहिती सादर केली. हल्ल्याची सूचना चुकीची असल्याचे स्टॅनिस्लाव्ह वरीष्ठांना पटवून देत असतानाच एक नव्हे पाच क्षेपणास्त्र डागली गेली असल्याचा संदेश समोर आला.
एका क्षणी अंतर्मनाच्या हाकेला ओ देत स्टॅनिस्लाव्ह यांनी वरीष्ठांना सांगितले, 'हल्ल्याच्या सर्व सूचना चुकीच्या आहेत.'
अमेरिकेच्या कथित हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सोव्हिएट रशियाने हल्ला केला असता...त्यावर अमेरिकेने सोव्हिएट रशियावर हल्ला केला असता आणि जग विनाशाच्या गर्तेत खोल खोल फेकले गेले असते.
'माझ्यासमोर असलेली माहिती दाखवत होती की अमेरिकेने क्षेपणास्त्र डागली आहेत. हा रिपोर्ट मी सर्वोच्च अधिकाऱयांना थेट पाठवला असता, तर मला कोणीही काही बोलले नसते. समोर असलेल्या फोनपर्यंत पोहोचणे इतकेच मला करायचे होते. सर्वोच्च अधिकाऱयांना थेट माहिती देण्याचे माझे काम होते. पण, मी जागेवरून हलू शकलो नाही. एखाद्या तापलेल्या तव्यावर घट्ट बसवून ठेवावे, अशी माझी अवस्था झाली होती...,' स्टॅनिस्लाव्ह यांनी काही वर्षांनंतर 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.
प्रशिक्षणात शिकवलेले सारे विसरून स्टॅनिस्लाव्ह यांनी आपल्याच कार्यालयातील वरीष्ठांना गाठले आणि उपग्रहाकडून चुकीचे संदेश येत असल्याचा दावा केला. हा दावा चुकीचा असता, तर काही मिनिटांतच स्टॅनिस्लाव्ह यांच्या कार्यालयाचा परिसर, मॉस्को शहर आण्विक हल्ल्याला बळी पडले असते.
'साधारण 23 मिनिटांनी माझ्या लक्षात आले की काहीच घडलेले नाही. उपग्रहांनी दिलेली सूचना खरी असती, तर आतापर्यंत सर्व काही नष्ट व्हायला हवे होते. तसे झाले नाही. मी सुटकेचा निःश्वास सोडला...', स्टॅनिस्लाव्ह यांनी मुलाखतीत सांगितले होते.
यथावकाश या प्रकरणाची चौकशी झाली. सोव्हिएटच्या उपग्रहांनी सूर्यकिरणांच्या ढगातून होणाऱया परावर्तनाला आंतरखंडीय क्षेपणास्त्र समजून धोक्याची सूचना दिली असल्याचे उघड झाले. जग विनाशापासून वाचविणाऱया स्लॅनिस्लाव्ह यांच्याबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
स्टॅनिस्लाव्ह कालांतराने प्रसिद्धीपासून दूर गेले. त्यांच्याबद्दल कोणालाच काही ठावठिकाणा नव्हता. जर्मन चित्रपट निर्माते कार्ल शुमाकर यांच्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त जगासमोर आले. शुमाकर यांनी स्टॅनिस्लाव्ह यांच्यावर चित्रपट काढला आहे. 7 सप्टेंबरला स्टॅनिस्लाव्ह यांचा वाढदिवस. त्यानिमित्त शुभेच्छा द्यायला शुमाकर यांनी स्टॅनिस्लाव्ह यांच्या घरी फोन केला, तेव्हा त्यांचा मुलगा दिमित्र पेट्रोव याने वडिलांचे 19 मे रोजी निधन झाल्याची माहिती दिली.
शुमाकर यांनी याबद्दलची घोषणा सोशल मीडियावर केली आणि पाहता पाहता जगभरातील प्रसार माध्यमांपर्यंत स्टॅनिस्लाव्ह यांच्या निधनाचे वृत्त पोहोचले.
गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७
ले.जनरल झा यांनी सूत्रे स्वीकारली
डेहरादून - भारतीय लष्करी अकादमीचे (आयएमए) 48 वे प्रमुख (कमांडंट) म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सोमवारी सूत्रे हाती घेतली.
ले.जनरल झा यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि "आयएमए'चे माजी विद्यार्थी आहेत. 13 डिसेंबर 1980 रोजी 17 व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. राष्ट्रीय रायफल्स बटॅलियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.
उत्कृष्ट कामगिरी व सवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पीटीआय सोमवार, 4 सप्टेंबर 2017
लष्कर पोलिस दलात आता महिलांचा प्रवेश - पीटीआय
नवी दिल्ली - भारतीय महिला विविध क्षेत्रांत आज सहजपणे काम करीत आहेत. देशातील संरक्षण दलांमध्येही त्या महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी पेलत आहे. लष्कराच्या पोलिस सेवेतही महिलांचा समावेश लवकरच होणार आहे.
लष्कराच्या क्षेत्रात लिंगभेदाचे अडथळे दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे लष्करी पोलिस दलात अंदाजे 800 महिलांची भरती करता येणार आहे. दरवर्षी 52 महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे, असे लष्कराचे ऍडज्युटंट जनरल ले. जनरल अश्विनी कुमार यांनी शुक्रवारी सांगितले. लष्करात जवान म्हणून महिलांची भरती करण्याचा आपला विचार असून प्रथम लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करून याची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जून महिन्यात सांगितले होते.
"लिंगभेदावर आधारित गुन्हांचा तपास करण्यासाठी मदत होण्यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ले.जनरल कुमार यांनी दिली. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे व अभियांत्रिकी विभाग तसेच सिग्नल यंत्रणा अशा ठिकाणी महिला काम करीत आहेत.
लष्करी पोलिसांचे कार्य
छावणी व लष्करी तळांवर सुरक्षा राखणे, लष्कराचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करण्यापासून जवानांना रोखणे, शांतता आणि युद्ध काळात जवान आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करणे, युद्धकैद्यांना हाताळणे आणि नागरी पोलिसांना गरजेनुसार मदत करणे आदी कामांची जबाबदारी लष्करी पोलिसांकडे असते.
पीटीआय :शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017
सज्जता आणि जवानांच्या कल्याणाला प्राधान्य - वृत्तसंस्था
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन; पदाची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली : लष्कराची सज्जता, संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरण, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि जवानांचे कल्याण या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे देशाच्या नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केले.
देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री असलेल्या सीतारामन यांनी आज या खात्याचा अतिरिक्त कार्यभार असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सीतारामन यांनी सूत्रे स्वीकारण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात पुरोहितांनी प्रार्थना म्हटल्या. या वेळी सीतारामन यांचे आई-वडीलही उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लष्कराची सज्जता हीच माझ्या प्राधान्यक्रमावर असेल. लष्कराला सर्व सोयी आणि शस्त्रे पुरविण्याकडे पूर्णपणे लक्ष दिले जाईल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या. पाकिस्तानकडून सुरू असलेले छुपे युद्ध आणि चीनची वाढती आक्रमकता या पार्श्वभूमीवर लष्कराला आपली क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे वारंवार लक्षात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाशी चर्चा करून लष्कराचे प्रलंबित प्रश्न सोडविणे आणि संरक्षण खरेदीदरम्यान "मेक इन इंडिया'चा परिणामकारक वापर करणे यावर भर दिला जाईल, असे सीतारामन या वेळी म्हणाल्या.
संरक्षणमंत्री झाल्याने सीतारामन आता अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या सदस्या झाल्या आहेत. या समितीमध्ये पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश असतो. संरक्षणमंत्री म्हणून त्यांच्यासमोर लष्कराची सज्जता वाढविणे आणि आधुनिकीकरणातील प्रशासकीय अडथळे दूर करणे ही प्रमुख आव्हाने आहेत.
"सीआरपीएफ'ला प्राधान्य हवे
संरक्षण दलांसाठी शस्त्र खरेदी करताना निमलष्करी दलाला प्राधान्य द्यावे, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नव्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे आज केली. निर्मलाजी हा मुद्दा योग्य प्रकारे हाताळतील, असा विश्वासही राजनाथसिंह यांनी या वेळी व्यक्त केला. स्वदेशी बनावटीची नवी शस्त्रे केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) सुपूर्त करण्याच्या कार्यक्रमावेळी राजनाथसिंह यांनी शस्त्रखरेदीबाबतची अडचण सांगितली. "सीआरपीएफसाठी शस्त्रखरेदी संरक्षण मंत्रालयामार्फत होते. मात्र, खरेदीवेळी सीआरपीएफला योग्य ते प्राधान्य मिळत नाही,' असे ते म्हणाले.
वृत्तसंस्था शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017