आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या जमान्यातही चांगले हस्ताक्षर असणे गरजेचे आहे. ते सुधारावे यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. हस्ताक्षर तज्ज्ञ किशोर कुलकर्णी यांनी सुंदर हस्ताक्षरासाठी व्रतच घेतलेले आहे. राज्यात आणि राज्याबाहेरही त्यांनी आजतागायत हजारोंना त्याबाबत मार्गदर्शन केले आहे. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते. त्यांचा हा ब्लॉग हस्ताक्षर
सुधारविण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी…
किशोर कुळकर्णी, 9420607059
“मुलांनो आपल्या शाळेत हस्ताक्षराचं भित्तीपत्रक काढायचं आहे. विद्यार्थ्यांची लेखन, संपादन आणि निर्मिती समिती आपल्याला तयार करायची आहे. ज्यांना यात सहभाग घ्यायचा त्या विद्यार्थ्यांनी आपली नावं माझ्याकडे द्यावीत.” सरोदे सरांनी पाचव्या इयत्तेतल्या आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सूचना केली. शाळेच्या या नव्या उपक्रमात सहभागी होण्याबद्द्ल शाळेतल्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता होती. त्यामुळे सगळ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदानं फुलले होते. सरोदे सरांनी पुन्हा सूचना केली…“मुलांनो, वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार नाही. पणं ज्यांचं अक्षर सुंदर आहे त्यांना प्राधान्य असेल.” ज्यांचं अक्षर सुंदर अशाच विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल हे समजल्यावर विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. सुंदर हस्ताक्षर कुणाचं आहे त्यांनी हात वर करा. ५० ची संख्या असलेल्या या वर्गातल्या फक्त १० विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे हात उंच झाले. “अरे, अरे.. काय ही अवस्था. मुलांनो हस्ताक्षर सुधारा.. अजून देखील तुम्हाला हस्ताक्षर सुधारण्याची संधी आहे.” सरांनी विद्यार्थ्यांना पुढं काही बोलण्या आधी तुषार हा विद्यार्थी उभा राहिला अन् म्हणाला, “ सर, आम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे. आमचं अक्षर आम्हाला सुधारायचं आहे.” विद्यार्थी एका सुरात म्हणाले. “मित्रहो, सुंदर हस्ताक्षर हा दागिना असतो. लहानपणापासूनच याकडे लक्ष दिलं तर कुणाचंही अक्षर अगदी सुंदर, सुघड होऊ शकतं. ती म्हण तुम्हाला ठाऊक आहे ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे.”
“सर, आम्ही सुंदर हस्ताक्षरासाठी संकल्प घेत आहोत. आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ मिळाले म्हणजे आम्ही आमचे अक्षर सुंदर करून दाखवू”. सरोदे सरांना विद्यार्थी म्हणाले.
विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पक्क्या निश्चयामुळं मी देखील आता तुमच्या अक्षर सुधार उपक्रमात सहभागी होणार आहे. यासाठी सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांना मी आपल्याकडे बोलावतो. मला विश्वास आहे की तुम्ही प्रयत्नपूर्वक आणि परिश्रमानं तुमचं गचाळ अक्षर सुंदर करून घ्याल.
शाळेच्या एका प्रसंगामुळे मला सुंदर हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. शाळेतल्या त्या वर्गातल्या चाळीस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं माझ्या या सुंदर हस्ताक्षर अभ्यास वर्गात सहभाग घेतला. विद्यार्थी अत्यंत उत्साही होते. त्यांनी अवघ्या महिन्यात सुंदर हस्ताक्षर केले. या चाळीस विद्यार्थ्यांनी निश्चय केला, जिद्दीनं सराव करून घेतला आणि त्यांना हा सुंदर हस्ताक्षराचा दागिना मिळाला. मुलांनो, ही किमया तुम्हाला सुद्धा करता येईल. होय, अगदी गच्चाळ, वाचता न येण्या सारखं अक्षर किमान वाचता येईल असं होऊ शकतं याचा विश्वास मी हस्ताक्षराचा मार्गदर्शक म्हणून नक्कीच देतो. देशदूतच्या मधला हा लेख तुम्हा वाचा, दिलेल्या प्रमाणे सराव करा आणि बघा तुमचं अक्षर कसं सुंदर रुप घेतं ते.
पेनबाबत थोडं…
मित्र हो, सुंदर हस्ताक्षरासाठी बाजारात अनेक पेन उपलब्ध आहेत, पणं शक्यतो तुम्ही फाउंटन पेन (नीब-जीपचा शाईचा) पेन घेतला तर अधिक चांगलं. बॉल पॉईंटचे पेन, किंवा जेल पेन, बारीक टोकदार पेन देखील बाजारात उपलब्ध आहेत पणं शाईचा पेन बरा. पेन कसा निवडला यावर देखील तुमचं हस्ताक्षर अवलंबून आहे. लिहायला अत्यंत गुळगुळीत कागद नको, मित्रांनो, लिहायला बसताना आपल्या पाठीचा कणा सरळ असावा म्हणजे ९० अशांचा कोन असावा. पेन धरताना कसा धरावा? काही विद्यार्थी आपल्या पाचही बोटांचा उपयोग पेन धरताना करतात. हलवाई जिलेबी बनविताना कापडाच्या पुरचुंडीत पातळ द्रवरुप मैदा तळायला घेतो तसा काहीसा पेन धरण्याची पद्धत आहे. मित्रहो. अशी पेन धरण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे. पेन अंगठा, तर्जनी आणि मध्यमा या तीन बोटांनीच धरायचा. सहज धरायचा अगदी जोर, दाब देऊन अजिबात पेन धरु नका. महत्त्वाचं म्हणजे वही किंवा कागद पेन यांचा किती अंशाचा कोन व्हावा तर ४५ अंशाचा कोन व्हावा. दोन कोन लक्षात घ्या. बसताना ९० अंश आणि पेन आणि वही यांच्यात ४५ अंशाचा कोन असावा. अक्षर वळविताना सहज वळविता येते. पेन कुठलंही वापरा पणं पेनाच्या टोकापासून तर पेन धरण्याचं अंतर हे सुयोग्यच असावं. साधारण पणे आपल्या बोटाचं एक पेरू एवढं अंतर पुरेसं असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त अंतर नसावं.
देवनागरी लिपी आणि मूळ चिन्हं..
आपली देवनागरी लिपी ही तीन प्रमुख चिन्हांनी बनलेली आहे मित्र हो. वर्तुळ, अर्धवर्तुळ आणि रेषा. या तीन चिन्हांना अजून सहा उपचिन्हे मी जोडली आहेत. तुम्ही अगदी पहिल्या इयत्तेत असताना ग म भ म मूळाक्षरे गिरवीत असाल त्यावेळी ही चिन्हे कदाचित शिकले असाल. या चिन्हांचा योग्य तो सराव केला तर तुमच्या अक्षराला छान वळण प्राप्त होईल. ही ९ चिन्हे आपणं बघू या.
गोल वर्तुळ , वरच्या बाजूला तोंड असलेले अर्धवर्तुळ, खालच्या बाजूला तोंड असलेले अर्ध वर्तुळ, डाव्या बाजूला तोंड असलेले अर्धवर्तुळ, आणि उजव्या बाजूला तोंड असलेले अर्ध वर्तुळ
रेषा – उभी रेषा, आडवी रेषा, डावीकडून उजवीकडे खाली येणारी रेषा आणि उजवीकडून डावीकडे खाली येणारी रेषा अशा नऊ चिन्हांचा उपयोग आपल्या देवनागरी लिपीत तहोतो.आपल्या अक्षरांना सुंदर वळण प्रप्त करण्यासाठी या मूळ चिन्हांचा भरपूर सराव करा मित्रहो. बघा हा आपल्याला क काढायचा असेल तर दोन अर्धवर्तुळ, उभी रेषा आणि आडवी रेषा यांचा उपयोग झाला.
अक्षरांचे नियम –
- अक्षरांची उंची समान यातच अक्षरांचा प्राण –
विद्यार्थी मित्रहो, आपलं अक्षर फार मोठं अथवा फार लहान नसावं. साधारणपणे एक रेघी वहिच्या दोन ओळींच्या अर्ध्या इतके छान प्रमाण योग्य असते. तुम्ही वहिच्या पहिल्या ओळीत ज्या आकाराचं अक्षर लिहिता आहात तेवढ्याच आकाराचं किंवा उंचीचं एक समान अक्षर तुम्ही काढायला हवे. ते थेट शेवटच्या ओळीपर्यंत हा नियम नीट ध्यानात घेतला पाहिजे. सुरवात ज्या प्रमाणबद्धतेने तुम्ही अक्षर काढत आला आहात त्याच पद्धतीनं शेवटच्या ओळीपर्यंत तुम्ही अक्षर काढा.
- अक्षरांची मुख्य रेषा सरळ आणि अक्षरांच्या मुख्य रेषेच्या निम्मे अक्षरांचे अतर अवयव-
या माझ्या नियमाचा तुम्ही अगदी काटेकोर पालन करायला हवे. तुम्हाला सुंदर हस्ताक्षर काढायचं असेल तर तुमची मुख्य रेषा अगदी सरळ यायला हवी. उदाहरणच द्यायचे झाले तर तुमचा अभय हे नाव लिहिले तर या शब्दाच्या प्रत्येक वर्णाची मुख्य रेषा ही सरळ असावी हे सूत्र आहे. अ हे वर्ण घेतले तर दोन अर्ध वर्तूळ, दोघं वर्तुळांना जोडणारी आडवी रेषा आणि शिरोरेषा म्हणजे आडवी रेषा आणि बरोबर काटकोन करणारी उभी रेषा ही अ ची मुख्य रेषा आहे. ही मुख्य रेषा सरळच काढायला हवी. याच नियमाचा पुढचा भाग म्हणजे मुख्य रेषेच्या निम्मे इतर अवयव.. अर्ध गोल, आणि अर्ध गोलाला जोडणारी आडवी छोटी रेषा यांचे प्रमाण जर तुम्ही ध्यानात घेतलं तर हा नियम तुम्हाला दिसेल. अगदी याच पद्धतीनं तुम्ही सराव करणं गरजेचं आहे.
- रेषे एवढे दोन शब्द आणि दोन ओळींमध्ये अंतर –
मित्रहो, शिवाजी महाराजांच्या काळात सोळाव्या शतकात समर्थ रामदासांनी दास बोधात अक्षर कसे काढावे याची नियमावली दिलेली आहे. नीटनेटके अक्षर कसे काढावे याचे नियम अगदी आजही लागू पडतात. मुख्य रेषे इतके दोन शब्दांमध्ये अंतर असावे. या नियमाचा दुसरा भाग म्हणजे दोन ओळींमध्ये मुख्य रेषे इतके अंतर. हा नियम तुम्ही कोरे कागदावर लिहित असाल तर लागू होतो. तुम्ही मुलं रेषी वहीत, रेघी पानांवर लिहिता त्यामुळे दोन ओळींचं अंतर बरोबर सोडलं जातं. या सगळ्या नियमांचे अनुसरण करा. बघा या नियमांचे पालन केले तरी तुमच्या अक्षरात आहे त्यापेक्षा किती फरक पडतो ते.
मुलांनो, तुम्हाला सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. अक्षराच्या सरावासाठी २०० पेजेस वही करा. त्याचे दोन समान भाग करा. पहिल्या भागात वर्णमाला ज्या ९ चिन्हांनी बनते त्या चिन्हांचा सराव करा. उर्वरित दुसरा भाग त्याची तीन भागांमध्ये विभागणी करा. पहिला भाग फक्त वर्णांसाठी, दुसरा भाग शब्दांसाठी आणि तिसरा भाग वाक्यांसाठी, परिच्छेदासाठी वापरा. बघा तुमचं अक्षर महिन्यातच कसं सुंदर होतं ते. सुंदर हस्ताक्षर ही साधना आहे. ही साधना कशी करावी हे मी तुम्हाला सांगितले. सुंदर हस्ताक्षराचे गुपितं मी तुम्हाला सांगितले आहे. आता सराव आणि मेहनत तुम्हाला करायची आहे. मला खात्री आहे तुम्ही तुमचे अक्षर सुंदर घडवाल.
- किशोर कुळकर्णी,
४४, वैष्णवी पार्क, मातोश्री स्कूल जवळ,
निमखेडी शिवार, नॅ.हायवे ६ शेजारी, जळगाव खान्देश.
9420607059
Original article was published in Deshdoot Aug 20, 2016. http://www.deshdoot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा