काबूल - उत्तर अफगाणिस्तानमधील मझार ए शरीफ या देशातील तिसऱ्या सर्वांत जास्त लोकसंख्येच्या शहरामधील भारतीय वकिलातीवर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या वकिलातीमधील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील भारतीय राजदूत अमर सिन्हा यांनी य पार्श्वभूमीवर दिली आहे.
या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी येथे जोरदार लढाई सुरु असून यासाठी लष्कराचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कर व अफगाणिस्तानच्या सैन्यातर्फे संयुक्तरित्या ही मोहिम राबविण्यात येत आहे. दहशतवाद्यांची संख्या किमान पाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. बल्ख प्रांताचे गव्हर्नर अत्ता मुहम्मद नूर हे या प्रकरणी विशेष लक्ष देत असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. आत्तापर्यंत दोन दहशतवाद्यांना धाराशयी करण्यात लष्करास यश आले आहे.
दहशतवाद्यांनी काल (रविवार) रात्री वकिलातीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांनी वकिलातीच्या दिशेने किमान पाच क्षेपणास्त्रे डागल्याचेही निष्पन्न झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
पठाणकोट या भारतीय हवाई दलाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या एकाच दिवसानंतर अफगाणिस्तानमधील भारतीय वकिलातीस लक्ष्य करणारा हा हल्ला अत्यंत संवेदनशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानला भेट देत येथे भारताकडून बांधण्यात आलेल्या संसदेचे अनावरण केले होते. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील हा हल्ला भारतीय परराष्ट्र धोरणासमोरील आव्हान मानले जात आहे.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा