नवी दिल्ली - पठाणकोटमधील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 जानेवारीला होणारी परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द करण्याचा भारत विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेचा आराखडा निश्चित करण्यासाठी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे 14 जानेवारीला पाकिस्तानला जाणार असल्याचे नियोजनात ठरले आहे. दुसऱ्या दिवशी ते पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव अझीझ अहमद चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, दहशतवादी हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानमध्येच असल्याचा दाट संशय असल्याने ही बैठक रद्द करण्याचा विचार केला जात आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही, भारत-पाक नियोजित चर्चेआधी दहशतवादी हल्ले अथवा इतर काही घटना घडून चर्चा रद्द झाल्याच्या घटना आधी घडल्या असल्याने या चर्चेचे भविष्यही अनिश्चित आहे.
पठाणकोट येथील हवाई तळावर शनिवारी सकाळी झालेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेली शोधमोहीम अद्यापही सुरूच आहे. हवाईतळावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याने त्यांनी तग धरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हल्ल्यानंतर किमान दोन वेळेस तरी सर्व दहशतवादी मारले गेले असल्याचे वृत्त मिळाले होते. मात्र, काही वेळातच पुन्हा गोळीबारांचे आवाज येत तळावर अद्यापही दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले होते. तसेच, पहिल्या दिवशी मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांनंतरही पाचवा आणि सहावा दहशतवादी मारल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. आज त्यालाही लष्कराकडून दुजोरा मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हल्ला केलेल्या आणि मारल्या गेलेल्या एकूण दहशतवाद्यांच्या संख्येबाबत संभ्रम आहे.
दहशतवाद्यांकडे असलेल्या एके 47 रायफल्स अत्याधुनिक होत्या. हवाई तळाचा परिसर तब्बल दोन हजार एकरांचा असून, यापैकी काही भाग जंगले अणि उंच गवतांनी व्यापला आहे. तसेच, तळावरील कर्मचाऱ्यांची घरेही याच भागात आहेत. त्यामुळेच शोधमोहिमेला वेळ लागत असल्याचे लष्कराने सांगितले आहे.
जिहाद कौन्सिलने घेतली जबाबदारी
या हल्ल्यासाठी जैशे महंमद जबाबदार असल्याचा आरोप होत असतानाच युनायटेड जिहाद कौन्सिल या संघटनेच्या "हायवे स्क्वाड‘ने हा हल्ला केल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. अनेक दहशतवादी संघटनेची मूळ संघटना म्हणून जिहाद कौन्सिलकडे पाहिले जाते. त्यांनी ई-मेलद्वारे एक निवेदन प्रसिद्ध करत ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या दाव्याबाबत दिल्लीमधील तज्ज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.
दिवसभरातील घटना
- हल्लाप्रकरणी "एनएसए‘कडून गुन्हा दाखल
- हुतात्मा गुरुसेवकसिंग यांच्यावर अंबाला जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार
- हुतात्मा लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांच्यावर बंगळूरमध्ये अंत्यसंस्कार
- पठाणकोटमधील शोधमोहिमेसाठी अधिक कुमक मागविली
- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली
[PTI] [Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा