पाक पंतप्रधानांशी दूरध्वनीवरून चर्चा
नवी दिल्ली - पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्ती आणि संस्थांवर पाकिस्तानने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज सांगितले.
हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी आज मोदींशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती भारताने पाकिस्तानला दिल्याचेही मोदी यांनी शरीफ यांच्या निदर्शनास आणून दिले. पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे पूर्ण सहकार्य असेल, असे आश्वासन शरीफ यांनी या वेळी मोदी यांना दिले.
सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या शरीफ यांनी आज दूरध्वनीवरून मोदी यांच्याशी चर्चा केली. शरीफ यांनी या वेळी पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन मोदींना दिले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी काल पाकिस्तानला काही महत्त्वाचे पुरावे देत त्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्ताननेही हे पुरावे तत्काळ न नाकारता योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
पंतप्रधान मोदींनीही शरीफ यांना याप्रकरणी तत्काळ कृती आवश्यक असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
[UNI]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा