नवी दिल्ली - पठाणकोटमधील हल्ल्याचा परिणाम भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू झालेल्या चर्चेच्या प्रक्रियेवर होऊ नये, यासाठी दोन्ही देशांमधून प्रयत्न सुरू आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणी कोणतेही भाष्य न करता निर्णयाची सर्व जबाबदारी नेत्यांवर सोडली असून, पाकिस्ताननेही चर्चा प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे आवाहन केले आहे.
भारतामध्ये दहशतवादी हल्ले अथवा घुसखोरी झाल्यानंतर दोन देशांमधील शांतता प्रक्रियेला खीळ बसल्याचा इतिहास आहे. हल्ल्यामागे पाकिस्तानातीलच काही घटक असल्याचे पुरावे देऊनही पाकिस्तान सरकारने ते नाकारले होते. यंदा मात्र त्यांच्या या भूमिकेत बदल झाला आहे. पठाणकोटमध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधून घुसखोरी केली आणि त्यांनी पाकिस्तानस्थित सूत्रधाराशी चर्चाही केल्याचे भारताचे म्हणणे आहे. पाकिस्तानने ही बाब लगेचच नाकारली नसून, भारताने दिलेल्या पुराव्यांची छाननी सुरू असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनीही पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल नासीर खान जांजुआ यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही पठाणकोटमधील कारवाई संपूर्ण झाल्यानंतरच पुढील धोरण ठरविणार असल्याचे सांगितले आहे. पाकिस्ताननेही तीव्र शब्दांत हल्ल्याचा निषेध केला आहे.
[यूएनआय ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा