हैदराबाद - पाकिस्तानने सीमेपलिकडून दहशतवादी कृत्ये न थांबविल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
पंजाबमधील पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे.
तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे.
पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हैदराबाद येथे सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
गडकरी म्हणाले, की आम्हाला पाकिस्तानसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. पण, याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत असा होत नाही.
भारताविरोधात कारवाईसाठी पाकिस्तान अशा प्रकारची मदत करत असेल, तर आम्हीही चोख प्रत्युत्तर देवू. दहशतवादी सतत सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसत आहेत.
पाकिस्तानला माहिती आहे, की ते भारताविरोधात उघडपणे युद्ध जिंकू शकत नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची कृत्ये करून निष्पाप नागरिकांचा बळी घेत आहेत.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा