सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जानेवारी 2016 - 06:36 PM IST
पुणे - धर्म, न्याय आणि नीतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हा विचार पुढे नेताना शिवविचार आणि शक्ती यांचा संगम व्हायला हवा, असा नारा देत सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आगामी दिशा "शिवशक्ती संगम‘ कार्यक्रमात रविवारी स्पष्ट केली. शक्तीशिवाय प्रतिष्ठा नाही असे सांगत, देशाला परमवैभवाला नेण्यासाठी संघाशिवाय तरणोपाय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातर्फे मुळशी तालुक्यातील जांभे, नेरे आणि मारुंजी या गावांच्या सीमेवर आयोजित "शिवशक्ती संगम‘ कार्यक्रमात भागवत बोलत होते. सरकार्यवाह भैयाजी जोशी, पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया, प्रांत संघचालक नाना जाधव, प्रांत कार्यवाह विनायक थोरात व्यासपीठावर उपस्थित होते. संघाच्या सुमारे एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी या मेळाव्यात गणवेशासह सहभाग नोंदविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यश रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार, महापालिका, नगरपरिषदा आणि जिल्हापरिषदांचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील निमंत्रितही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे 200 फूट रुंद आणि 80 फूट उंच भव्य व्यासपीठावर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लक्षवेधक होती. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक मा. गो. गोळवलकर गुरुजी यांच्याही भव्य प्रतिमा मांडण्यात आल्या होत्या. नेटक्या संयोजनामुळे संघाचे शक्तिप्रदर्शन उत्तरोत्तर खुलत गेले. ध्वजवंदनानंतर घोषाचे दिमाखदार प्रात्यक्षिक झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत भागवत यांनी सुमारे चाळीस मिनिटे स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांचे विचार स्वयंसेवकांनी मनात रुजवून शक्तीची साधना करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
भागवत यांनी शिवाजी महाराजांचे विचार, दूरदृष्टी आणि सामर्थ्य यांचा दाखला त्यांच्या भाषणात दिला. भागवत म्हणाले, ""संघाचे संघटन तत्त्वनिष्ठ आहे, ते व्यक्तिनिष्ठ नाही, त्यामुळेच तत्त्वांचे अनुकरण करायचे असते. तत्त्वाचे सगुण रूप म्हणून शिवाजी महाराजांकडे आपण पाहतो. म्हणूनच संघाच्या सहा उत्सवांमध्ये शिव-उत्सवाचा समावेश पूर्वीपासूनच आहे. त्यामुळेच संघाचे स्वयंसेवक छत्रपतींच्या चरित्राचे स्मरण करतात. शिव ही शिवत्वाची परंपरा आहे. "सत्यम् शिवम् सुंदरम्‘ ही देशाची संस्कृती आहे. शिवत्वाचे शाश्वत अस्तित्व जगाने ओळखले आहे. मात्र, जगाची रीत शक्ती ओळखणारी असल्याने शिवविचार आणि शक्तीचा संगम आवश्यक आहे.‘‘
शक्तीशिवाय प्रतिष्ठा मिळणार नाही, हा मुद्दा विशद करताना ते म्हणाले, ""इंग्रजांच्या राजवटीत आपल्यावर गुलामगिरी लादली गेली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, दोन युद्धे जिंकल्यावर, अणुचाचणी झाल्यावर आपली प्रतिष्ठा जगात वाढत आहे. शक्तिशाली राष्ट्रांच्या वाईट गोष्टींवर चर्चा होत नाही; पण दुर्बल राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींनाही किंमत नाही. भारतीय संस्कृतीवर चर्चा फार होते; परंतु देशाची शक्ती वाढते, तेव्हा सत्तेची प्रतिष्ठा वाढते.‘‘
""स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जगात देशाची प्रतिष्ठा वाढली. अस्तित्वाची "जात‘ एकच असून, देशातील विविधतेचा स्वीकार करायला हवा. एकमेकांतील भेद विसरून सामाजिक समरसता रहावी, अन्यथा संविधानाचा उपयोग होणार नाही.‘‘
संघाच्या लाखो स्वयंसेवकांची उपस्थिती म्हणजे हे काही प्रदर्शन नाही, तर संघ समाजात सर्वत्र पोचला आहे, त्याचे प्रतीक आहे. या देशाला परम वैभवाला न्यायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पर्याय नाही, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.
थोरात यांनी प्रास्ताविकात संघाच्या विस्ताराची, सेवाकार्याची आणि वाटचालीची माहिती दिली. 1983 मध्ये पुण्यातच तळजाई येथे झालेल्या शिबिरात 35 हजार स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. शिवशक्ती संगममध्ये एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी भाग घेतल्याचे थोरात यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा