वृत्तसंस्था रविवार, 30 सप्टेंबर 2018
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.30) 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेसोबत संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सैनिकांबाबत आजच्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आपण शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार केली जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या आठवणींनाही मोदींनी यावेळी उजाळा दिला आणि सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीला सलामही केला. सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्ष पूर्ण झाली, याबाबत सर्व देशवासीयांनी 29 सप्टेंबर हा दिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला असल्याचेही त्यांनी सांगितले. जे देशातील शांतता आणि प्रगती नष्ट करण्याचा प्रयत्न करतील, त्या सर्वांना आमचे जवान सडेतोड उत्तर देतील. आमच्या देशातील शांतता भंग करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या सन्मानासोबत कोणताही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम विविध कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. गांधीजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील 2 वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, पंतप्रधान मोदींनी नौदल अधिकारी अभिलाष टॉमीसंदर्भातही चर्चा केली, 'अभिलाष यांचा जीव कसा वाचवला जाणार, याबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. ते खोल समुद्रात अडकले होते. न खाता-पिता मृत्युशी झुंज देत होते. अभिलाष हे धाडसी सैनिक आहेत. त्यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले.