नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांकडून अनेकदा वाहनांची कागदपत्रे आणि वाहनपरवानाची मागणी केली जात असे. या कागदपत्रांची पूर्तता न केल्यास संबंधित वाहनचालकाला दंड आकारला जात असे. मात्र, आता यापुढे पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही.
माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये बदल करण्यात आल्याने आता यापुढे वाहतूक पोलिसांना वाहनपरवाना आणि वाहनाच्या कागदपत्रांची मागणी करता येणार नाही. याबाबत परिवहन मंत्रालयानेही अध्यादेश जारी केला असून, यामध्ये डिजिलॉकर किंवा एम- परिवहन या अॅपवर कागदपत्रे अपलोड केल्यास ती अधिकृत समजण्यात येणार आहेत.
यापूर्वी अनेकदा वाहनांची कागदपत्रे, वाहनपरवाना, पीयूसी, इन्शुरन्स कागदपत्रेसोबत ठेवणे शक्य होत नव्हते. यामुळे वाहतूक पोलिसांनी अडविल्यास नाहक त्रास भोगावा लागत होता. तसेच भुर्दंडही भरावा लागत होता. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.
वाहन क्रमांकावरून पोलिस त्यांच्या मोबाईल अॅपवर सर्व माहिती पाहू शकणार आहेत. तसेच वाहनचालकही आपल्या अॅपवरून ही कागदपत्रे त्यांना दाखवू शकणार आहेत. याचा फायदा वाहनचालकांसह पोलिसांनाही होणार आहे.
दरम्यान, एम- परिवहन हे अॅप सध्या अँड्रॉइडवर उपलब्ध असून, येत्या 10 दिवसांत ते आयओएसवरही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वृत्तसंस्था
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा