नवी दिल्ली - "वन रॅंक, वन पेन्शन‘ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार उशीर करत असल्याच्या विरोधात निवृत्त लष्करी अधिकारी व सैनिकांनी आज देशभर निदर्शने केली. केंद्र सरकारने या धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत माजी सैनिकांनी उद्या (ता. 15) पासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पंजाब, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांतील सुमारे 50 शहरांमध्ये माजी सैनिकांनी निदर्शने केली.
देशभरात अनेक ठिकाणी आज माजी सैनिकांनी "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू करावी, या मागणीसाठी निदर्शने केली. राजधानी दिल्लीत "जंतर-मंतर‘वर आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांनी सहभागी झाले होते. सरकारबरोबर अधिकृत पातळीवर आणि मागील दाराने सुरू असलेल्या चर्चेला यश न मिळाल्यामुळे माजी सैनिकांनी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षांपासून माजी सैनिक ही मागणी करत आहेत.
"वन रॅंक, वन पेन्शन‘ धोरणाची अंमलबजावणी कधी होईल याबाबत ठोस आश्वासन सरकारकडून देण्यात आले नाही, त्यामुळे माजी सैनिकांच्या देशव्यापी संघटनेने (आयईएसएम) निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. ""या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले होते, मात्र त्यास एक वर्ष उलटून गेले आहे,‘‘ असे आयईएसएमचे माध्यम सल्लागार कर्नल (निवृत्त) अनिल कौल यांनी सांगितले. "वन रॅंक, वन पेन्शन‘ लागू होत नाही, तोपर्यंत माजी सैनिकांचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आयईएसएमचे उपाध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) सतबीर सिंग यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. माजी सैनिकांनी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचा प्रचार केला होता. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर मोदींनी दिलेले वचन पूर्ण करावे, अशी मागणी माजी सैनिकांच्या एका संघटनेतर्फे या वेळी करण्यात आली.
"जय जवान, जय किसान‘चा नारा
"जंतर-मंतर‘वरील आजच्या निदर्शनामध्ये शेतकऱ्यांचे काही गट आणि दिल्ली विद्यापीठ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते हे विशेष! प्रचारामध्ये निदर्शनस्थळी शेतकऱ्यांचे आगमन होताच "जय जवान, जय किसान‘च्या घोषणा देण्यात आल्या.
आकडे बोलतात...
"वन रॅंक, वन पेन्शन‘चे लाभार्थी
- 22 लाख - माजी सैनिक
- 6 लाख - वीर पत्नी
आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, मात्र काही लोकांनी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
- मनोहर पर्रीकर, संरक्षणमंत्री
[पीटीआय]