पठाणकोट - सुरक्षाव्यवस्थेत काही "त्रुटी‘ राहिल्यामुळेच दहशतवाद्यांना हवाईतळावर हल्ला करणे शक्य झाल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज मान्य केले. हवाईतळावरील सर्व सहा दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्याकडे पाकिस्तानात तयार केलेली शस्त्रे होती, असेही त्यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
हल्ला झालेल्या हवाईतळाची पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईनंतर सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, शोधमोहीम अद्यापही जारी असल्याचे त्यांनी सांगितले. हवाईतळावर आता कोणताही दहशतवादी असण्याची शक्यता नसली तरी शोधमोहीम संपेपर्यंत ठोसपणे काही सांगणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. तसेच, शोधमोहीम उद्या (ता. 6) सकाळपर्यंत चालणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सर्व सात जवानांना "हुतात्मा‘ मानून, युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या सवलतींप्रमाणेच या जवानांच्या कुटुंबीयांनाही सर्व फायदे मिळतील, असे पर्रीकर यांनी जाहीर केले. हल्ला करताना दहशतवाद्यांजवळ चाळीस ते पन्नास किलो गोळ्या, बॉंब आणि अत्याधुनिक ग्रेनेड लॉंचर असा शस्त्रसाठा होता, अशी माहिती त्यांनी दिली. दहशतवादी तळापर्यंत कसे पोचले, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले,""मला काही त्रुटी दिसत आहेत. मात्र, सुरक्षेच्या बाबतीत तडजोड झाली असेल, असे मला वाटत नाही. तपास पूर्ण झाल्यावर सर्व बाबी स्पष्ट होतील.‘‘ सुरक्षाविषयक सर्व गोष्टी उघड करता येणार नसून, काही मुद्दे तपासापुरतेच मर्यादित ठेवले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांकडील शस्त्रे पाकिस्तानी बनावटीची होती, असेही त्यांनी सांगितले.
हुतात्मा झालेल्या जवानांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल अभिमान व्यक्त करत पर्रीकर यांनी, त्यापैकी फक्त एकालाच थेट कारवाईत दहशतवाद्यांकडून वीरमरण आले, तर उर्वरित जण दुर्दैवी घटनांमुळे मारले गेल्याचे सांगितले. हवाईतळावरील सर्व उपकरणे, शस्त्रे आणि नागरिक सुरक्षित असून, फक्त दहशतवादी लपून बसले होते, त्या इमारतीचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. तपास करणाऱ्या सर्व संस्थांचे त्यांनी कौतुक केले.
नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य
हवाईतळाच्या मोठ्या परिसरात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला कारवाई करताना प्राधान्य देण्यात आले होते. प्रचंड मोठ्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना मारताना सामान्य नागरिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी फार काळजीपूर्वक कारवाई करावी लागली. ही अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक कारवाई असल्याचेही ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर म्हणाले...
- सहा दहशतवादी ठार, तळावर आता दहशतवादी नाहीत, शोधमोहीम उद्यापर्यंत चालणार
- चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांना युद्धात प्राण गमावल्याचा सन्मान आणि फायदे देणार
- चौकशीनंतर सुरक्षेतील त्रुटी दूर करणार
- दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत सीमा सुरक्षा दलाकडून अहवाल मागविला
- दहशतवाद्यांकडील काही सामग्री पाकिस्तानी बनावटीची
- हल्ल्याबाबतची योग्य माहिती आणि पुरावे पाकिस्तानकडे सुपूर्त ः पीएमओ
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा