मुंबई - नवाझ शरीफ यांच्याबरोबरचे चहापान हा आमच्या पंतप्रधानांचा खासगी विषय आहे. चहाच्या बदल्यात पठाणकोटला सात जवानांनी मरण पत्करले. त्या वीर जवानांची कुटुंबे आक्रोश करीत आहेत. हे वीर का शहीद झाले? देशाला प्रश्न पडला आहे. हे हौतात्म्य का झाले? जवान वीरमरण पत्करत आहेत, पण देश लढत आहे काय? उत्तर द्या!, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शिवसेनेने आज (मंगळवार) पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेने ‘सामना‘ या मुखपत्रातील अग्रलेखातून पंतप्रधानांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत टीका केली आहे.
शिवसेनेने म्हटले आहे, की आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते. फक्त सहा-सात दहशतवादी घुसवून पाकिस्तानने आपल्याविरुद्ध युद्धच पुकारले आहे. हवाई दलाच्या पंजाबमधील पठाणकोट येथील तळावर मूठभर दहशतवादी जोरदार हल्ला करतात व ७२ तासांनंतरही हे युद्ध संपत नाही. हे प्रकरण फक्त चिंता करण्यासारखे नाही तर आपल्या प्रचंड लष्करी सामर्थ्याचे जे ढोल आपण वाजवत असतो ते ढोल फोडणारा हा भयंकर प्रकार आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत व देशाची अंतर्गत सुरक्षाही साफ कोसळल्याचा हा पुरावा आहे. देशावर हे असे परचक्र आले असताना सरकारविरोधी सूर काढणे योग्य नाही. राजकीय टीका-टिपण्या न करता सरकारी कारवाईस पाठिंबा द्यावा. कारण हा देशाच्या सुरक्षेचा मामला आहे, पण देशाच्या सुरक्षेचा मामला असला तरी राज्यकर्ते गंभीर आहेत काय? हजारो सैनिक, रणगाडे, पंजाबचे पोलीस पठाणकोटला आहेत तरीही फक्त सहा-सात दहशतवाद्यांनी या लष्करी सामर्थ्यास जेरीस आणले. सात जवान या युद्धात शहीद झाले व पन्नासावर घायाळ झाले. हा हिशेब तपासला तर फक्त सहा माथेफिरू दहशतवाद्यांची किंमत चुकवून पाकिस्तानने हिंदुस्थानची अब्रू घालवली आहे. देशाचे संरक्षणमंत्री, पंतप्रधान वगैरे मंडळींनी धडा घ्यावा व सुधारणा कराव्यात असा हा प्रकार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अचानक लाहोर यात्रा करताच, ‘काय हा मुत्सद्दीपणा! जग तर थक्क झाले!’ असे सांगितले गेले. पठाणकोटच्या हल्ल्यानंतर त्या सगळ्यांची दातखिळी बसली आहे. काँग्रेस राजवटीत असा हल्ला आज झाला असता तर ‘पाकिस्तानवर हल्ला करून धडा शिकवा!’ अशी मागणी झाली असती; पण आज कोणीच बोलत नाही व बलिदान केलेल्या जवानांना फक्त ‘ट्विटर’वर श्रद्धांजली वाहण्याचे राष्ट्रकार्य चालले आहे. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान नव्हते तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आम्हाला आज आवर्जून आठवते आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना मोदी म्हणाले होते, ‘भाई, बंदुक की गोली की गुँज में वार्ता कैसे हो सकती है?’ मोदींनी तेव्हा केलेला हा सवाल रास्तच होता. आम्हाला तेच मोदी हवे आहेत! आजही बंदुका आणि तोफांच्या आवाजांनी देशाच्या कानठळ्या बसल्या आहेत आणि तरीही पठाणकोट हल्ल्याचा बदला आपण घेणार नसू तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरील शस्त्रांचे चलत् प्रदर्शन दाखविण्यात अर्थ नाही. हे शस्त्र प्रदर्शन अशा वेळी कुचकामी ठरते. लपून-छपून येणार्या पाकड्या अतिरेक्यांशी लढताना आपल्या जवानांना वारंवार वीरमरण यावे, हे दुर्दैव आहे. आपल्या बहाद्दर सैनिकांची आणखी किती कलेवरे आपल्याच देशात पडलेली पाहायची? जवानांच्या अलौकिक शौर्याचा पुरुषार्थ बाळगतानाच आता पाकिस्तानात फौजा घुसवून दुश्मनांचे काय नुकसान केले ते देशाला सांगा.
[वृत्तसंस्था] [Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा