सोमवार, 4 जानेवारी 2016 - 01:08 PM IST
पठाणकोट - "व्यूहात्मकदृष्टया अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेला पठाणकोट येथील विमानतळ उध्वस्त करण्याच्या उद्दिष्टाने दहशतवादी येथे आले होते; मात्र या विमानतळावरील सर्व सामग्री व कर्मचारी आता सुरक्षित आहेत,‘ असे भारतीय लष्कराच्या एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याने आज (सोमवार) सांगितले.
पठाणकोट येथील हवाई तळ परिसरामध्ये अद्यापी दोन दहशतवादी दडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या दहशतवादी हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह सात जवान हुतात्मा झाले असून पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या परिसरामध्ये अद्यापी दडून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी राबविण्यात येत असलेली मोहिम आता अंतिम टप्प्यात असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा दलातर्फे (एनएसजी) स्पष्ट करण्यात आले आहे. पठाणकोट हवाई दलाच्या परिसराच्या निवडक भागामध्ये आता प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पठाणकोट हल्ल्यासंदर्भात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि परराष्ट्र मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी संवेदनशील बैठक सुरु आहे. एनएसजी आणि लष्कराच्या कमांडोंनी येथील हवाई तळाच्या संपूर्ण परिसराची झाडाझडती सुरू केली असून, दहशतवाद्यांना कोंडीत पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री आणि पहाटे गोळीबार ऐकू आला, मात्र हा गोळीबार शोध मोहिमेचा भाग असू शकतो, असे त्यांनी सांगितले.
[Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा