ठाणे - पाकिस्तानने आतापर्यंत आपला विश्वासघातच केला आहे,त्याच्याशी आणखी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी जी भाषा करीत होते, त्याच भाषेत त्यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 6) येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उद्धव बोलत होते. यावेळी "साम‘ वाहिनीचे चंद्रमोहन पुप्पाला (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार), "सकाळ‘च्या "एसआयटी‘चे तुषार खरात (स्व. प्रमोद भागवत शोधपत्रकारिता पुरस्कार) यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे "सकाळ‘चे निवृत्त प्रतिनिधी सुधीर कोऱ्हाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, की पाकिस्तानने आतापर्यंत आपला विश्वासघातच केला आहे. त्यांच्याशी किती काळ चांगल्या भावनेने चर्चा करणार आहोत, असा प्रश्न केला. परिस्थिती नियंत्रणात नसेल तर किती काळ चर्चेची वाट बघणार आहोत? त्यांना लवकरात लवकर उत्तर देणे अपेक्षित आहे. निवडणुकीच्या आधी मोदींनी जी भाषा वापरली होती, त्याच भाषेत सडेतोड उत्तर ते देतील, अशी आशा आहे.
पत्रकारांविषयी उद्धव म्हणाले, की हल्लीच्या पत्रकारांनी पथ्ये पाळली तर हल्ल्याची भीती राहणार नाही. ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा आदर्श त्यांनी घेतला, तर पत्रकारावरील हल्ल्यांच्या प्रतिबंधासाठी कायदा करण्याची गरज नाही.‘ आपण पत्रकार संरक्षण कायद्याच्या विरोधात नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत. त्यांनी अनेक मोठी खाती विदर्भातल्या मंत्र्यांकडे दिली आहेत. त्यांनी विदर्भाचा विकास करावा; पण महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा