वॉशिंग्टन - पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, अशी इच्छा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे. पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बे म्हणाले, की भारताने या हल्ल्याबाबत दिलेल्या पुराव्यांवरून पाकिस्तानने कारवाई करावी. पाकिस्तान सरकारशी याबाबत चर्चा झाली असून, ते आमच्या अपेक्षेनुसार संबंधित दहशतवाद्यांवर कारवाई करतील अशी आशा आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाकिस्तान सरकारनेही या हल्ल्याची निषेध करावा. पाकिस्तानने सर्व प्रमुख दहशतवादी संघटनांना लक्ष्य करावे.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा