नवी दिल्ली - हवाई दलाच्या पठाणकोट तळावर घुसलेल्या दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी "नॅशनल सिक्युरिटी गार्ड‘च्या (एनएसजी) "ब्लॅक कॅट‘ कमांडोंना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा वापर करावा लागला. सुमारे तीनशे कमांडो या कारवाईत सहभागी झाले होते. धुमश्चक्रीत सात जवान हुतात्मा झाले, तर सहा दहशतवादी ठार झाले.
पठाणकोटच्या तळावर दहशतवादी घुसल्यानंतर एक जानेवारीला दिल्लीच्या पालम तळावरून सुमारे 160 कमांडोंची पहिली तुकडी हवाई दलाच्या विमानाने पठाणकोटला रवाना झाली. या संघर्षात दलाचे 21 जवान जखमी झाले. दलाच्या बॉंबशोधक पथकाचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल ई. के. निरंजन यांना प्राण गमवावे लागले. दोन आणि तीन जानेवारीला प्रत्येकी 80 "ब्लॅक कॅट‘चा समावेश असलेल्या दोन तुकड्या पठाणकोटला रवाना झाल्या, असे सूत्रांनी सांगितले. या तुकड्याही संघर्षात सहभागी झाल्या.
"एनएसजी‘चे युनिट हरियानातील मनेसर येथे असून, कोणत्याही क्षणी निघण्यासाठी हे दल सज्ज असते. पठाणकोटकडे कमांडो पाठविण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने "एनएसजी‘ मुख्यालयाला केली आणि मुख्यालयाने लगोलग तसा आदेश मनेसरला पाठविला. कमांडोंची पहिली तुकडी महानिरीक्षक (कारवाई) मेजर जनरल दुष्यंत सिंह यांच्या नेतृत्वाखाली होती, तर महासंचालक आर. सी. तायल रविवारपासून पठाणकोटमध्ये तळ ठोकून होते.
दहशतवाद्यांबरोबरच्या संघर्षात "एनएसजी‘ कमांडोंनी "एमपी-5‘ ऍसल्ट रायफल, "ग्लोक‘ पिस्तुले, कर्नर शॉट बंदुका आणि दरवाजे उडविण्यासाठी आधुनिक दारूगोळ्याचा वापर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी अशा शस्त्रास्त्रांचा वापर झाला होता. कमांडोंच्या मदतीसाठी सहा बॉंबशोधक श्वानही मदतीला देण्यात आले होते. पठाणकोट तळाचा परिसर मोठा असल्यामुळे दहशतवाद्यांचा निःपात करण्यासाठी वेळ लागणे साहजिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
[पीटीआय]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा