सोमवार, 4 जानेवारी 2016 - 09:41 AM IST
चंदीगड- पाकिस्तानने पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे. मात्र संबंधित दहशतवाद्यांनी फोनवरून पाकिस्तानमध्ये संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशयही गुप्तचर सूत्रांकडून व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा दौरा केला होता.
पंजाबमधील पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची पद्धती आणि इतर माहितीवरून हा हल्ला जैश-ए-मोहंमद या संघटनेने घडवून आणला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय हवाई दलाच्या पठाणकोट येथील तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रात्रभर शोधमोहीम सुरू होती. या परिसरात आणखी दोन दहशतवादी जिवंत असल्याचे रविवारी दुपारी स्पष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर सुरक्षा दलांची पुन्हा चकमक सुरू झाली.
कर्नाटकमधील तुमकूर येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या कार्यक्रमाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोट येथील हवाई तळावरच्या सद्य परिस्थितीबद्दल माहिती दिली. ते दोघेही या कार्यक्रमाला दोघेही उपस्थित होते. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
[Sakal]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा