पंजाबातील पठाणकोटमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान; तीन जवान हुतात्मा
पठाणकोट - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आज केलेला हल्ला भारताने उधळून लावला. सुरक्षा जवानांनी जोरदार प्रतिहल्ला करत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, तर नंतर सुरू झालेल्या शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याला मारण्यात आले. तत्पूर्वी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले, तर सहा सुरक्षा जवान जखमी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर अल्पकाळातच हा हल्ला झाला आहे.
हवाई तळ उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने चार ते पाच दहशतवाद्यांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा हल्ला केला होता. हे सर्व जण पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचा अंदाज लष्करी सूत्रांनी व्यक्त केला आहे. लष्कराने काल रात्री राबविलेल्या शोधमोहिमेनंतर लगेचच हा हल्ला झाला. या भागातील एका पोलिस अधीक्षकाचे दोन दिवसांपूर्वी अपहरण झाल्याने सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे हवाई तळावरील सुरक्षा कर्मचारी सावध होते. दहशतवाद्यांनी हल्ला करताच त्यांना चोख प्रत्युत्तर मिळाले. यामुळे हवाई तळावर घुसण्याच्या इराद्याने हवाई तळाच्या पाठीमागे असलेल्या जंगलातून आलेल्या दहशतवाद्यांना तळाच्या बाहेरच्या भागात असलेल्या लंगरपर्यंतच पोचता आले. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा होता. जवानांनी केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात तीन जवानांना वीरमरण आले. यामध्ये हवाई दलाच्या गरुड कमांडो दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. जखमी झालेल्या इतर सहा जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला केलेल्या दहशतवाद्यांची संख्या चारपेक्षा अधिक असण्याची शक्यता असल्याने उर्वरित दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत असून या दरम्यानच आणखी एका दहशतवाद्याला शोधून त्याला मारण्यात जवानांना यश आले. यानंतरही पठाणकोट आणि गुरुदासपूर जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी एमआय जातीच्या लढाऊ हेलिकॉप्टरचाही वापर केला जात आहे. या दहशतवाद्याचे पळून जाण्याचे सर्व संभाव्य मार्ग बंद करण्यात आले असून, तो लवकरच हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर...
- हवाई तळावरील सर्व शस्त्रे आणि सामग्री सुरक्षित
- शेजारील राज्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा
- हेरगिरीप्रकरणी अटकेत असलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याची या हल्ल्यासंदर्भात चौकशी करणार
- तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे अधिकारी पठाणकोटमध्ये दाखल
- हैदराबाद, दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्था वाढविली
- पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल घटनास्थळी
- शोधमोहिमेदरम्यान पुन्हा गोळीबार
नागरिकांमध्ये घबराट
पहाटेच गोळीबाराचे आवाज सुरू झाल्याने आणि काही वेळातच हेलिकॉप्टर्सची घरघर सुरू झाल्याने येथील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, दहशतवाद्यांना मारल्याचे वृत्त कळताच त्यांची भीती गेली. पोलिस निरीक्षकाच्या अपहरणानंतर येथे मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आल्याने नागरिकही सावध होते. हल्ल्यानंतरही अनेकांनी आपली दैनंदिन कामे सुरूच ठेवली. हल्ला केलेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय असल्याने अनेक नागरिकांनी मोर्चा काढत पाकिस्तानचा निषेध केला.
पाककडून निषेध
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानने निषेध व्यक्त केला आहे. दहशतवाद नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, याकामी आम्ही भारताला पूर्ण सहकार्य करू, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
...दुसरा हल्ला
जुलैमध्ये गुरुदासपूर जिल्ह्यातील दीनानगर येथे दहशतवादी हल्ला झाला होता. दीड तासात सात हल्ले झाले होते.
वीस वर्षांनी पंजाबमध्ये मोठा हल्ला झाला, ११ तासांच्या एन्काउंटरनंतर दहशतवाद्यांना मारण्यात आले होते.
काय घडले?
पहाटे साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या तळावर गोळीबार
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे ६ तास धुमश्चक्री
गुरदासपूरच्या पोलिस अधीक्षकांची कार पळविलेल्या दहशतवाद्यांनीच हा हल्ला केल्याचा संशय
या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीर, हिमाचल आणि चंडीगडकडे जाणारे रस्ते वाहतूक रोखली
हल्ल्यादरम्यान लष्कर, हवाई दल आणि एनएसजी कमांडोंनी मोर्चा सांभाळला. हेलिकॉप्टर, ड्रोन विमानांद्वारेही टेहळणी
दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बहावलपूरमधून सीमा पार केली. त्यानंतर जम्मू-काश्मीरमार्गे पंजाबमध्ये घुसल्याची माहिती
गुप्तचर यंत्रणेने १ जानेवारीला या हल्ल्याबाबतचा इशारा दिला होता.
भारताची प्रगती सहन न होणाऱ्या मानवतेच्या शत्रूंनीच हा हल्ला केला आहे. हा हल्ला रोखणाऱ्या आपल्या जवानांचा आणि सुरक्षा यंत्रणेचा अभिमान वाटतो. कोणत्याही दुष्ट शक्तींना पराभूत करण्यास आपले लष्कर सक्षम आहे, असा विश्वास मी देशवासीयांना देतो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित जैशे महंमदचा सहभाग नाकारता येणार नाही. पाकिस्तानसह सर्व शेजारी देशांशी आम्हाला शांततामय संबंध हवे आहेत. मात्र भारतावर झालेल्या कोणत्याही हल्ल्याला तोडीस तोड उत्तर मिळेल.
- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री
पंतप्रधान मोदींच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाला हे पहिले मोठे आव्हान मिळाले आहे. चर्चा आणि दहशतवादाच्या आपल्या भूमिकेच्या पुढे जाऊन भाजपने विचार करण्याची गरज आहे.
- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू- काश्मीर
एका बाजूला आमचे सरकार पाकिस्तानशी शांततेच्या गोष्टी करत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले करण्यात येत आहेत. पठाणकोट हल्ला म्हणजे नरेंद्र मोदींना पाकिस्तान दौऱ्याची दहशतवाद्यांकडून देण्यात आलेली भेट आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे.
- संजय राऊत, शिवसेना खासदार
ही वेळ केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याची नाही. आम्ही भारतीय सैन्यासोबत आहोत.
- लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष
[पीटीआय]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा