फरीदाबाद - ‘समान हुद्दा, समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत (व्हीआरएस) भ्रम पसरविले जात असून, पंधरा वर्षे नोकरी करणाऱ्या प्रत्येक जवानाला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘गेल्या 42 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओआरओपीबाबत आमच्या सरकारने निर्णय घेतला. आम्ही सैनिकांना दिलेल्या वचनानुसार ही योजना लागू केली आहे. गेल्या 42 वर्षांमध्ये काहीही न केलेल्यांना आम्हाला विचारण्याचा काही हक्क नाही. या योजनेसाठी फक्त 3 हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती. पण, याची व्याप्ती पाहून आम्ही ही तरतूद 8 ते 10 हजार कोटींपर्यंत पोचविली आहे. देशासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या सैनिकांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. व्हीआरएस घेणाऱ्या जवानांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सैन्यामधील प्रत्येक दहा जवानांपैकी एक जवान हरियानातील आहे. त्यामुळे हरियानाच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे. हरियानामध्ये स्त्री भ्रूण हत्येविरोधात लढाई चांगली सुरू आहे. हरियाना सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी चांगली पावले उचलली आहेत. गुजरातनंतर हरियाना हे माझे दुसरे घर असून, मी येथे अनेक वर्षे राहिलो आहे. फरीदाबादची ओळख मिनी इंडिया अशी असून, देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक येथे वास्तव्यास आहेत.‘‘
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा