नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सहा टक्के वाढीव महागाई भत्ता (डीए) जाहीर केला आहे. म्हणजे आतापर्यंत मूळ वेतनावर 113 टक्के मिळणारा महागाई भत्ता यापुढे 119 टक्के होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या निर्णयाला मंजुरी दिली. 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 56 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे ठरविलेल्या सूत्रानुसार ही वाढ देण्यात आली असून, यामुळे सरकारच्या तिजोरीवर यंदाच्या वर्षी (2015-16) 4436.76 कोटी रुपयांचा भार पडेल आणि दरवर्षी 6655.15 कोटी रुपयांचा बोजा सरकारी खजिन्यावर येईल.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितले, की आर्थिक वर्षाच्या एक जुलैपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यापासून महागाई भत्ता मिळेल. आतापर्यंत वेतनावर 113 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. त्यात आणखी सहा टक्के वाढ होईल. त्याचप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्याही शिफारसी येणार असून, त्याही विचारात घेतल्या जातील.
वाढता खर्च...
50 लाख केंद्रीय कर्मचारी
56 लाख निवृत्त कर्मचारी
4436.76 कोटी रुपये सरकारी तिजोरीवर यंदाचा भार
6655.15 कोटी रुपये दरवर्षी पडणारा भार
[सकाळ न्यूज नेटवर्क]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा