नवी दिल्ली, (3-12-2015) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्यासह सुगम्य भारत अभियान या राष्ट्रीय स्तरावरील मोहिमेचा आज शुभारंभ केला. अपंग व्यक्तींना सार्वत्रिक सुलभता, विकासात समान संधी, स्वतंत्रपणे जगता यावे आणि जीवनाचा आनंद घेता यावा हा या मोहिमेचा उद्देश आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जेटली आणि गेहलोत यांच्या हस्ते अपंग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर आणि विजय साम्पला यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सुगम्य भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्रालये आणि राज्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. अपंग व्यक्तींना सार्वत्रिक सुलभता मिळावी यासाठी प्रभावित स्मार्ट शहरांमध्ये तरतूद असली पाहिजे. सर्व पुरस्कार विजेत्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि सांगितले की, विकलांग शब्दाऐवजी दिव्यांग शब्द वापरण्याबाबत विचार झाला पाहिजे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुगम्य भारत अभियान म्हणजे सर्वसमावेशक समाजासाठी उचललेले योग्य पाऊल असून ती समाजाची जबाबदारी असल्याचे जेटली यांनी यावेळी सांगितले.
अपंग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी सरकारने अनेक पावले उचलली असल्याचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितले. यात शिष्यवृत्ती, मूकबधिरांसाठी स्वतंत्र संस्था, अपंग व्यक्तींसाठी 1700 कोटी रुपये खर्चाचे विशेष विद्यापीठ उभारण्याचेही सरकारने ठरवले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ते कार्यरत होईल. सुगम्य भारत अभियानामुळे अपंग व्यक्तींच्या सबलीकरणासाठी आणखी मदत होईल, असे गेहलोत यांनी सांगितले. एक वेब पोर्टल आणि मोबाईल ॲप्लिकेशन यावेळी सुरू करण्यात आले.
(PIB सामाजिक न्याय व सक्षमीकरण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा