नवी दिल्ली, (1-12-2015) - ज्या गुजरात मध्ये महात्मा गांधीनी शिक्षणाचे प्रयोग यशस्वी केले , त्या परंपरेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आजही , मन आणि बुद्धी शिक्षित केल्यास अहिंसक मार्गाने सामाजिक बदल शक्य आहे, हे जगाला दाखवून द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या ६२व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते.
महात्मा गांधीनी सामाजिक पुनर्रचनेसाठी नई तालीमच्या माध्यमातून नवा प्रयोग केला आणि ज्ञान व व्यवसाय ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत हे जगाला सांगितले . नई तालीम ही तीन एच पासुन बनलेली शिक्षणप्रणाली आहे.हृद्य, हात आणि मेंदू! या तिघांच्या समन्वयातून खरे शिक्षण मिळते. आजही गुजरातच्या अनेक आश्रमशाळामध्ये नई तालीम अस्तित्वात आहे. नई तालीम ही चरित्र निर्माणाचे शिक्षण आहे, आणि आजही त्याची नितांत गरज आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
गुजरात विद्यापीठात विद्यार्थ्यांचे चारित्र्य, क्षमता , संस्कृती आणि जाणीवजागृतीचे शिक्षण दिले जाते, असे गौरवोद्गार राष्ट्रपतीनी काढले. गांधीजीनी घालून दिलेल्या आदर्श मार्गावर देशाला पुन्हा घेऊन जाण्याचाच हा प्रयत्न आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. आज देशात झपाट्याने शहरीकरण होत असले तरीही अजून ६८ टक्के जनता खेड्यात राहते. या जनतेपर्यंत मूलभूत सुविधा पोचलेल्या नाहीत अशा जनतेत जाऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम गुजरात विद्यापीठाचे विद्यार्थी करतात. त्यांना तसे विशेष प्रशिक्षण दिले जाते, हाच गांधीजींचा दृष्टीकोन होता. इथले विद्यार्थी चरखा आणि कम्प्युटर सारख्याच उत्साहाने शिकतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यातून श्रमप्रतीष्ठेचा धडा गिरवला जातो , असे राष्ट्रपती म्हणाले. जातीय सौहार्दासाठी गांधीजीनी आपले आयुष्य वेचले. विद्या ही माणसाला सर्व जाती धर्माच्या बंधनातून मुक्त करते, असा त्यांचा संदेश होता. त्यामुळे , लोकांच्चे मनःपरीवर्तन करून आजही अहिंसक मार्गाने बदल घडवता येतो,या गांधीजींच्या संदेशाचे प्रत्यक्ष प्रमाणच हे विद्यार्थी देत आहेत,असे राष्ट्रपती म्हणाले.
[PIB]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा