पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 रेसकोर्स येथे एका समारंभात
सुवर्णविषयक तीन योजनांचा शुभारंभ केला. सुवर्णमुद्रीकरण योजना, सार्वभौम सुवर्णरोखे योजना आणि
भारत सुवर्ण नाणी अशा या तीन योजना आहेत. या तीन योजना म्हणजे “सोने पे
सुहागाचे” उत्तम उदाहरण असल्याचे वक्तव्य पंतप्रधानांनी यावेळी केले.
भारताकडे 20 हजार टन सोने असल्याने भारताला
गरीब देश म्हणून संबोधण्याचे कोणतेही
कारण नाही, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात उपलब्ध असलेल्या सोन्याचा उत्पादनक्षम वापर झाला पाहिजे आणि या योजनांनी
ते लक्ष्य साध्य करण्याचा मार्ग आपल्याला दाखवला
आहे, असे ते म्हणाले. भारतीय समाजात सोने हे महिला सक्षमीकरणाचा एक स्रोत असून
या योजना सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करतात, असे पंतप्रधान म्हणाले. भारतात
कुटुंबाचे पिढयान्पिढया असणाऱ्या
सोनाराशी असलेल्या विश्वासाच्या नात्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.
भारतातील सोनारांना या योजनांची सखोल माहिती झाल्यानंतर तेच या योजनांचे सर्वात
मोठे प्रतिनिधी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
अशोकाचे
चिन्ह असणाऱ्या भारत सुवर्ण नाण्यांचे प्रकाशनही भारतासाठी अभिमानाची बाब
असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आता यापुढे लोकांना परदेशातील सुवर्ण नाण्यांवर अवलंबून राहायला
नको, असेही पंतप्रधान म्हणाले. या
योजनांबाबतच्या संकेत स्थळाचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यावेळी सुरुवातीच्या सहा गुंतवणकदारांना गुंतवणूकीची
प्रमाणपत्र पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आली. केंद्रीय
वित्तमंत्री अरुण जेटली, वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सितारामण आणि केंद्रीय
वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी
उपस्थित होते.
PIB Mumbai
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा