सातारा दि. 4 (जि.मा.का.) -माजी सैनिकांना शस्त्रास्त्रांचा चांगला अनुभव असतो. या अनुभवावर स्वत:मधील कौशल्याचा विकास करुन 'मेक इन इंडिया' मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील महासैनिक भवनमध्ये जिल्हास्तरीय माजी सैनिक मेळावा व पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.मुद्गल यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी 22 महा. एन.सी.सी. बटालियनचे कर्नल एस.एस.पाटील, सैनिक कल्याण विभागचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर, माजी सैनिक महामंडळाचे महाव्यवस्थापक निवृत्त मेजर आर.जी.कुलकर्णी, मेस्को एंटरप्रायजेसचे व्यवस्थापक निवृत्त कर्नल दि.मु.रानडे, कमांडर कौस्तुभ गोसावी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मुद्गल पुढे म्हणाले, सातारा जिल्हा हा शुरविरांचा जिल्हा आहे.देश रक्षणासाठी सातारच्या ज्या ज्या हुतात्म्यांनी बलीदान दिले. त्या सर्वांना प्रथम मी वंदन करतो. आज आपल्या देशामध्ये अठरा ते चाळीस या वयोगटातील कार्यक्षम वर्गांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपला देश तिस-या क्रमांकावर असून तो अनेक देशांशी प्रतीस्पर्धा करतोय. महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पध्दतीने नियोजन केले जाते त्यामुळे माजी सैनिकांना शासनाच्या माध्यमातून खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास योजनेंतर्गत अठ्ठावीस क्षेत्रे निवडण्यात आली आहेत. यामध्ये 1300 प्रशिक्षणाचा समावेश आहे.
माजी सैनिकांना विविध शस्त्रे हाताळण्याचा तसेच संरक्षण सामुग्री हाताळण्याचाही मोठा अनुभव असतो. या माजी सैनिकांना अशा संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनामध्ये कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षीत करुन मोठे योगदान घेता येईल. अशा पध्दतीने मोठी औद्योगिक संस्था आपण उभी करु शकतो. तिच्या माध्यमातून सैनिकांना चांगला रोजगार ,उत्पन्न उपलब्ध होऊ शकते आणि पर्यायाने देशाचा आयातीवर होणारा खर्चही वाचवू शकतो. त्यासाठी 'मेक इन इंडिया' या योजनेमध्ये माजी सैनिकांनी कौशल्य विकासाच्या जोरावर उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही श्री.मुद्गल यांनी शेवटी केले.
यावेळी शौर्यपदक विजेते कमांडर कौस्तुभ गोसावी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 10 लाख रुपयांचा धनादेश देऊन जिल्हाधिकारी श्री.मुद्गल यांनी गौरवीले. सैनिक कल्याण विभागाचे संचालक निवृत्त कर्नल सुहास जतकर यावेळी म्हणाले, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आणि या योजनेचा प्रसार करणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. 15 ते 20 वर्ष सैन्यदलात काम केलेल्या अनुभवी सैनिक हे देशाच्या उत्पादनात संपत्ती ठरु शकतात. अशा माजी सैनिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराभिमुख बनविले पाहिजे निश्चितपणे त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल.
मेस्को एंटरप्रायजेसचे व्यवस्थापक निवृत्त कर्नल दि.मु.रानडे यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले 2022 पर्यंत देशातील 50 कोटी युवकांना कौशल्ययुक्त करण्याचे उदिद्ष्ट आहे केवळ पदवी न घेता स्वत:मधील कौशल्य हेरुन त्याचा विकास केला तर त्याचा जास्त फायदा होतो. यावेळी माजी कॅप्टन उदाजीराव निकम, कमांडर गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले.कर्नल राजेंद्रकुमार जाधव यांनी प्रास्तावीक करुन सर्वांचे आभार मानले या शुभारंभ कार्यक्रमास माजी सैनिक, वीरमाता, वीरपीता, वीरपत्नी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र उपस्थित होते.
[ सैनिक कल्याण विभाग ]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा