जिल्हा प्रशासनाचे महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीला आदेश
पुणे - तुम्ही टोल नाक्याच्या गर्दीत फसला असाल आणि तीन मिनिटांहून अधिक वेळ होऊन गेला असेल, तर शुल्क न भरता पुढे जाऊ शकता... या वेळेत नागरिकांकडून शुल्क घेतले नाही, तर नाक्यांचे गेट विनाशुल्क खुले करून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने महामार्ग प्राधिकरणास दिले आहेत. सातारा आणि नाशिक रस्त्यांवरील नाक्यांसाठी हा आदेश देण्यात आला आहे.
महामार्गावर टोल वसूल करताना तीन मिनिटांमध्ये ते काम करण्याची तरतूद राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि टोल वसूल करणारी कंपनी यांच्या करारामध्ये आहे. मात्र, आतापर्यंत त्यानुसार कार्यवाही केली जात नव्हती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये सातारा आणि नाशिक रस्त्यांवर करारातील अटींचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या आहेत. लोकांचा वेळ वाचावा म्हणून ही सूचना दिली असून, या संदर्भात उद्या (ता.20) प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राव यांनी सांगितले.
पुण्यात येणाऱ्या सातारा आणि नाशिक रस्त्यावरील टोल नाक्यांवर वाहनांच्या सतत रांगाच्या रांगा लागतात. प्रवाशांना शनिवारी-रविवारी अर्धा तास, तर कधी तासभर नाक्यावर थांबावे लागते. टोल घेण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याने ही प्रतीक्षा करावी लागते व त्यांचा वेळ वाया जातो. आता मात्र या वेळेची किंमत टोल नाकाचालकांना मोजावी लागणार आहे. तीन मिनिटांपेक्षा अधिक काळ वाहनांच्या रांगा कायम राहिल्यास टोल नाक्याचे सर्व दरवाजे खुले करून द्यावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या तरतुदीची दखल घेतल्याने करारातील नागरिकांच्या हक्काचा भाग समोर आला आहे.
प्राधिकरणाचा पाठिंबा कंपनीला
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी टोल कंपन्यांची बाजू घेतली. रस्त्यांचे बांधकाम सुरू असल्याने या तरतुदीची अंमलबजावणी करता येत नसल्याची हतबलता त्यांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथेही रांगा लागतात. त्या ठिकाणी टोल वसूल का केला जातो, या प्रश्नाचे उत्तर मात्र अधिकाऱ्यांना देता आले नाही.
करारानुसार नियम काय आहे?
कराराप्रमाणे प्रत्येक टोल नाक्यावर शुल्काची पावती घेऊन दहा सेकंदांत एक वाहन पुढे सरकले पाहिजे आणि वाहनाचा प्रतीक्षा कालावधी तीन मिनिटांचा आहे. मात्र, प्रकल्प अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यांची कामे सुरू असल्याने एक वाहन पुढे सरकण्यास (सेवा कालावधी) सोळा सेकंद लागतात आणि प्रतीक्षा कालावधी पाच मिनिटे आहे, असे पाहणीत आढळले आहे.
काम अपूर्ण असताना ‘वसुली‘ का?
रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याने करारातील नियमांची अंमलबजावणी करता येत नाही, असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांना अनेक टोल नाक्यांवर पाच ते दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागते. तरीही तेथे टोल आकारणी केली जाते. याबद्दल अधिकाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर टोलवसुली करणाऱ्या यंत्रणेला नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मग काही रस्त्यांची कामे अपूर्ण असताना टोल आकारणी करताच कशी, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत.
‘टोल नाक्यावर शुल्क देण्यासाठी एखादे वाहन किती वेळ थांबाविण्यात यावे, यासंबंधी स्पष्ट तरतूद करारात आहे. त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणास दिल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू असले, तरी कंपनीकडून टोल वसूल केला जात असल्याने करारातील टोलसंबंधी नियमांचे पालन करणे त्यांच्यावर बंधनकारक आहे.‘‘
- सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे
- संतोष शाळिग्राम [ सकाळ वृत्तसेवा ] शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2015 - 03:45 AM IST
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा