सातारा : भारतीय सेनेतील माजी सैनिकांना "वन रॅंक, वन पेन्शन‘ करण्यासाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. ते अधिक तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक, पेन्शनर्स यांचा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी (ता. 23) दुपारी 12 वाजता साताऱ्यातील स्वराज मंगल कार्यालयात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माजी सैनिक व पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष, निवृत्त कॅप्टन उदाजीराव निकम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
निकम म्हणाले, "माजी सैनिकांना "वन रॅंक, वन पेन्शन‘ करावी, अशी मागणी 1982 पासून करत आहोत. मात्र, सर्वच सरकारनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या पद्धतीने पेन्शन लागू करण्यासाठी पुन्हा एकदा देशभरात आंदोलन सुरू आहेत. आधी 75 टक्के पेन्शन मिळत होती, त्यावरून 50 टक्के केली आहे. मोदी सरकार ही पद्धत सुरू करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावरही पाणी फिरले आहे. मागील आघाडी सरकारने दोन वेळा ही पद्धत लागू केल्याचे म्हटले होते. निवडणुकीपूर्वी 500 कोटी दिल्याचे सांगितले होते. मात्र, ते कोठे, कोणाला दिले हेच कळले नाही.‘‘
वन रॅंक, वन पेन्शन देण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही. नोकरशहाही या विरोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सेनेतील प्रमुखांशी चर्चा करून अभ्यास केला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाहीत, ही खंत आहे. या योजना लागू व्हावी, यासाठी सध्या देशभरात आंदोलन सुरू आहेत. साताऱ्यात त्याच अनुषंगाने मेळावा होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. दिल्ली येथे ता. दोन ऑक्टोबरला अण्णा हजारे आंदोलनास बसणार आहेत, अशीही माहिती निकम यांनी दिली. उपाध्यक्ष निवृत्त कॅप्टन रामचंद्र निंबाळकर उपस्थित होते.
[सकाळ वृत्तसेवा]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा