नवी दिल्ली - ‘वन रॅंक, वन पेन्शन‘वरून आंदोलन करणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी नमती भूमिका घेतली असून, हे आंदोलन आणखी दहा दिवस लांबविले जाणार नसल्याचे त्यांनी सरकारला सांगितले आहे.
आज पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी आंदोलकांची भेट घेऊन सरकारचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. "वन रॅंक, वन पेन्शन‘साठी निवृत्त लष्करी अधिकारी जंतरमंतरवर साखळी उपोषण करत आहेत. आज सकाळीच मिश्रा यांनी आमची भेट घेत आम्हाला आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती केली होती; पण जोपर्यंत सरकार काही ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असे आम्ही त्यांना सांगितल्याचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बलबीरसिंग यांनी सांगितले. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्यासाठी दहा दिवसांचा वेळ मागितला असल्याने आम्हीही या आंदोलनाचा अवधी वाढविणार नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.
[वृत्तसंस्था]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा