वृत्तसंस्था गुरुवार, 27 जुलै 2017
कारगिल: कारगिलसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अन्बू यांनी आज येथे केले.
कारगिलमधील हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर लेफ्टनंट जनरल अन्बू पत्रकारांशी बोलत होते. पश्चिम सीमेवरील लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील समस्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. 1999 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जिल्ह्यात उंचावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी चौकीवर कब्जा केला होता.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसह, कारगिल, द्रास येथे होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी संरक्षण दले ही सज्ज आहेत, असे अन्बू म्हणाले. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपले लष्कर तयार असल्याचे सांगून ते म्हणाले की, कारगिलसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ देणार नाही.
काश्मीर खोऱ्यातील सर्व सुरक्षिततेबद्दल ते म्हणाले की, दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई लष्कर आणि अन्य सुरक्षा दले एकत्रितपणे करीत आहेत. या एकत्रित समन्वयातूनच गेल्या तीन महिन्यांत लष्कराने 36 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले आहे. त्यामध्ये स्वत:ला स्वयंघोषित कमांडर म्हणविणाऱ्यांचाही समावेश आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात दहशतवादी भारतात घुसण्यासाठी लॉंचपॅडवर तयार आहेत, असे ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा