नवी दिल्ली: ""सन 2017 मधील भारत हा 1962 मधील भारतापेक्षा नक्कीच वेगळा आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज चीनला प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने इतिहासापासून काही तरी शिकावे, अशी मखलाशी चीनने काल केली होती. त्यावर जेटली यांनी ही प्रतिक्रिया दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जेटली म्हणाले, ""सिक्कीममध्ये सध्या भारत व चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावाची सुरवात चीननेच केली आहे. आम्हाला ते 55 वर्षांपूर्वीच्या युद्धाची आठवण करून देत असतील तर सध्याचा भारत हा त्यावेळीपेक्षा नक्कीच वेगळा आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.'' भूतानबाबत ते म्हणाले, ""भूतान सरकारने कालच जमिनीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. हा भारत व आमच्यातील मुद्दा आहे. भारताने सुरक्षा पुरवावी, असा करारच झाला असल्याचे भूतानने कालच स्पष्ट केले आहे. चीन या भागात उगाचच शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भूतानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यावरून हा प्रश्न पुरेशा स्पष्ट झालेला आहे.'' डोंगलॉंग येथे चीनकडून सुरू असलेल्या बांधकामाला भारतीय लष्कराने नुकताच अटकाव केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा