बीजिंग: सिक्कीम सेक्टरमधील भूमिकेवरून चर्चेसाठी भारताशी राजनैतिक संबंध अबाधित राहू शकतील. मात्र, कोणत्याही अर्थपूर्ण संवादासाठी आमचे निर्विवाद सार्वभौमत्व असलेल्या डोकलाम भागातून भारतीय जवानांनी माघार घेतलीच पाहिजे, असे चीनने आज स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ल्यू कांग यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, चीन आणि भारतादरम्यानच्या संवादासाठी राजनैतिक मार्ग अबाधित राहील. भारतीय जवानांनी 18 जून रोजी भारत आणि चीनदरम्यान निश्चित झालेल्या सीमेचा भंग केला आहे. चिनी सैनिकांनी सुरू केलेले रस्तेनिर्मितीचे काम थांबविण्यासाठी भारतीय जवान सिक्कीमजवळील डोकलाम भागात आल्यासंबंधीची तारीख चीनने पहिल्यांदाच अचूक सांगितली. भारतीय जवानांनी माघार घेत त्यांच्या हद्दीत गेले पाहिजे, हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही अर्थपूर्ण संवादासाठी ही पूर्वअट आहे, असे कांग यांनी नमूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा