हैदराबाद : मानवीहक्क लष्कराने नेहमीच चांगले जपले आहेत, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी शनिवारी येथे म्हटले. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या जमावाला तोंड देताना जीपला माणसाला बांधले गेले होते ती घटना विशिष्ट परिस्थितीत घडली होती. दगडफेकीच्या घटनांना तोंड देण्यास त्याच पद्धतीचा वापर वारंवार होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात तरूण पिढीने सुरक्षा दलांच्याविरोधात हाती शस्त्रे घ्यावीत यासाठी लोकांमध्ये चुकीची आणि गैरसमज निर्माण करणारी माहिती पसरवली जाते. दगडफेक करणाऱ्यांना तोंड देण्यासाठी जीपला एका व्यक्तिला बांधणारे मेजर लितुल गोगोई यांच्याबद्दल बोलताना रावत म्हणाले,''निर्माण झालेल्या परिस्थितीत आम्ही करीत असलेले काम व कृती ही जबाबदारीचे स्वरुप विचारात घेऊन असते.'' परंतु आम्हाला मानवी हक्कांची काळजी असते व मानवीहक्कांचे उल्लंघन होणार नाही एवढी काळजी आम्ही घेतो, असे रावत वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. दुंडीगल येथील हवाई दल अकादमीत भारतीय हवाई दलाच्या फ्लाईट कॅडेट्सनी प्रि कमीशनिंग पूर्ण केल्याच्या तसेच पदवी प्रदानाच्या संयुक्त कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मानवीहक्कांवर लष्कराचा प्रचंड विश्वास असून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याची लष्कराची चांगली ख्यातीही आहे, असे ते म्हणाले.
Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा