पणजी – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने कार्यरत असणारे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांच्या कार्याला गती आणि दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.
या अधिवेशनात अन्य प्रस्तावांसह भारत आणि नेपाळ यांना हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रस्ताव संमत करण्यात आला. या अधिवेशनाला भारतातील 22 राज्यांसह श्रीलंका आणि बांगलादेश येथील 132 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 342 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तेलंगण येथील भाजपचे आमदार आणि श्रीराम युवा सेनेचे संस्थापक टी. राजासिंह, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव अनिल धीर, बेंगळुरु उच्च न्यायालयातील अधिवक्ता आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे उपाध्यक्ष अमृतेश एन.पी. आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे उपस्थित होते.
यावेळी डॉ. पिंगळे पुढे म्हणाले, “शासकीय, वाणिज्य, शैक्षणिक आणि राजकीय या क्षेत्रांत उफाळून आलेल्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात संघटितपणे लढा देण्याचे अधिवेशनात ठरले. याद्वारे खऱ्या अर्थाने निकोप समाजव्यवस्था निर्माण होऊन त्या माध्यमातूनच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य असल्याचा विचार हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधींच्या मनात दृढ झाला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्रित येऊन राष्ट्र आणि धर्मरक्षण यांसाठी वर्षभर कार्य करण्याचेही ठरवले.
यावेळी आमदार श्री. टी. राजासिंह म्हणाले, “गोमातेची हत्या रोखण्यासाठी भाजपने राष्ट्रीय स्तरावर एक धोरण ठरवावे. गेली 6 वर्षे मी सनातन संस्थेचे कार्य जवळून पहात आहे. संस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद असून सनातन संस्था ही गोव्यासाठी भूषणावह आहे. परिषदेला संबोधित करतांना अधिवक्ता अमृतेश एन्.पी. म्हणाले, आजपासून अधिवक्त्यांच्या दोन दिवसीय शिबीराला आरंभ होत आहे. या शिबीरात विविध राज्यांतून 50 हून अधिक अधिवक्ते सहभागी होणार आहेत. हिंदूहितासाठी लढणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना कायदेविषयक साहाय्य कसे देता येईल, यासाठीचे धोरण या शिबिरात निश्चित करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व खात्याकडून हिंदूंच्या प्राचीन वास्तूंच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या विषयावर अधिवेशनात चर्चा झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा