पुणे - वेद, संस्कृती, परंपरा हे आपल्या देशाचे मूलभूत विचार आहेत. महासत्ता बनण्यासाठी या मूलभूत विचारांकडे जाण्याची गरज असल्याचे मत केद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज येथे व्यक्त केले.
विज्ञान भारती आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या विश्व वेद विज्ञान संमेलनात डॉ. सत्यपाल सिंह बोलत होते. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विजय भटकर, योगाचे अभ्यासक जेरी आर्मस्टॉंग व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सिंह म्हणाले, इंग्रजांच्या राजवटीने आपले मन गुलाम झाले आहे. आपण पाश्चिमात्यांवर अधिक विश्वास ठेवतो. गुलामगिरीनंतर आपली मानसिकता गुलामीची झाली आहे. आपण आपले मूळच हरवून बसलो आहोत. स्वाभिमानी देश बनायचा असेल, तर आपण मूळ विचारांवर ठाम राहणे आवश्यक आहे.
वेद हे मानवी संस्कृतीचे मूळ आहे. त्याची तुलना कुठल्याही ग्रंथांशी करता येणार नाही. वेद अनन्यसाधारण आहेत. ते स्वप्रमाण आहेत. ती देवांची देणगी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेदांचा अभ्यास करण्याची गरज आहे. रोजच्या दैनंदिन समस्यांची उत्तरे गीतेमध्ये आढळतात. जीवन समृध्द आणि संतुलित करण्यासाठी गीतेचा अभ्यास करावा, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. भटकर यांनी आपले विचार मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा