चंद्राबाबूंची केंद्र सरकारकडे मागणी
अमरावती - डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी चलनातून 500 आणि 2 हजार रूपये मुल्याच्या नोटा रद्द केल्या जाव्यात, अशी मागणी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी केंद्र सरकारकडे केली.
डिजिटल अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष असणारे चंद्राबाबू येथे पत्रकारांशी बोलत होते. 500 आणि 1 हजार रूपये मुल्याच्या नोटा बंद करण्याची मागणी सर्वप्रथम मी केली. त्या बंद करून 500 आणि 2 हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. मात्र, त्याही चलनातून बाद केल्या जाव्यात, असे ते म्हणाले. आंध्रमधील विशाखापटणम् पोलिसांनी आज हवाला रॅकेट उघडकीस आणले. यापार्श्वभूमीवर, चंद्राबाबूंनी नोटांबाबतची मागणी केली. हवाला मार्गाचा वापर करून 1 हजार 379 कोटी रूपये हस्तांतरित करण्यात आले. या व्यवहारांसाठी बनावट कंपन्यांची निर्मिती करण्यात आली. असे व्यवहार करणाऱ्यांचा रोल मॉडेल कोण आहे, असा सवाल करत टीडीपीचे अध्यक्ष असणाऱ्या चंद्राबाबूंनी अप्रत्यक्षपणे वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
जगन यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यावरूनही चंद्राबाबूंनी जगन यांच्यावर निशाणा साधला. एका आघाडीतील आम्ही (टीडीपी आणि भाजप) मित्रपक्ष आहोत. असे असताना जगन यांनी मोदींची भेट का घेतली? दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने त्यांनी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
Dailyhunt
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा