पुणे - "मराठा समाजाने कोणत्याही नेतृत्वाशिवाय संयमाने आणि शिस्तीने भावना मांडल्या आहेत. त्यासाठी कोणत्याही तथाकथित मराठा नेत्याला बोलावून त्याच्याशी चर्चा करण्याची गरज नाही. मागण्यांबाबत चर्चा खूप झाली, आता निर्णय हवा आहे...‘‘ अशी मागणी मराठा मोर्चातील युवतींनी केली.
मेधा कुरुमकर, नुपूर दरेकर, पौर्णिमा पाध्ये, करिष्मा पारधी आणि सानिया तापकीर या युवतींनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन वाचल्यानंतर काही बोलायचे आहे काय, अशी विचारणा या युवतींच्या शिष्टमंडळाकडे केली. त्यावर प्रत्येकीने मागण्यांबाबत निवेदन केले. कोपर्डी घटनेतील आरोपींना तातडीने फाशी द्या; तसेच ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांनाही शिक्षा द्या, शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, शेतकऱ्यांच्या मुलींना पैशाअभावी शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवा, मराठा युवकांना व्यवसायासाठी साह्य करा आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा, अशा मागण्या या युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या. मागण्या ऐकल्यानंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तुमच्या मागण्या आधीच सरकारपर्यंत पोचल्याचे सांगितले. कोपर्डी घटनेची चौकशी स्वतः पुण्याच्या पोलिस आयुक्तांकडे असून, आरोपींना लवकर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकार काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""अनेक मागण्या या धोरणात्मक आहेत. त्यातील काही गोष्टींबाबत कार्यवाहीही सुरू आहे. तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोचविल्या जातील.‘‘ मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळ शांतपणे बाहेर रस्त्यावर मोर्चात सहभागी झाले.
दरम्यान, ऍट्रॉसिटी कायद्याबाबत आंदोलकांमध्ये प्रचंड चीड होती. या कायद्याच्या कवचकुंडामुळेच कोपर्डीतील आरोपींनी आधीही एक खून पचवला आहे. या कायद्याच्या गैरवापराच्या कचाट्यातून अनेक सरकारी अधिकारी आणि पोलिस महासंचालकही सुटले नाहीत. त्यामुळे लोकांचे जगणे कठीण झाल्याने या कायद्यात दुरुस्ती करून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळावा, पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पडताळणी केल्यानंतरच गुन्हा दाखल करावा आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांविरोधातही शिक्षेची तरतूद करावी, अशा मागण्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
मराठा समाजाच्या मागण्या-
सर्व मराठ्यांना मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे.
शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे.
शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात.
शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती आणि पिकाला हमीभाव मिळावा.
राज्य कृषी आयोग स्थापन करून शेतकऱ्यांसाठी मोफत विमा योजना राबवावी.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत द्यावी.
शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण द्यावे.
अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठ्यांपुरते स्थापन करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा