मुंबई : विविध समाजमाध्यमांच्या वापरातून विवेकशील समाजनिर्मिती करण्याबरोबरच या समाजमाध्यमांचा विधायक कार्यात सकारात्मक उपयोग करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमास लाभत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर 'ॲपब्रेन' या संकेतस्थळाने 'महामित्र' ॲपला देशात प्रथम क्रमांकाचे 'सोशल' ॲपचे रॅकिंग केल्याने 'महामित्र'ची लोकप्रियता वाढत चालली आहे.
ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे आता सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन या सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टीने 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे.
सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे त्या भागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याची, प्रत्यक्ष संवाद साधण्याची, सेल्फी घेण्याची संधीदेखील मिळणार आहे.
या उपक्रमात विशेषत: ग्रामीण भागातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून सर्वस्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. काल सायंकाळपर्यंत २५ हजारांपेक्षा अधिक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी सुरु राहणार असून 'सोशल मीडिया-महामित्र' उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा